संपूर्ण आयुष्य संघ परिवार आणि भाजपशी एकनिष्ठ राहूनही दुर्लक्षित राहिल्याने अडगळीत पडलेल्या जुन्या जाणत्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा गेल्या रविवारी डोंबिवलीत झाला. डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकातील नूपुर सभागृहात हा नाराजांचा मेळावा भरला होता. मुरबाड, बदलापूर, कल्याण, डोंबिवली परिसरातील भाजपने सध्या अडगळीत टाकलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यामध्ये सर्वाधिक भरणा होता. ‘भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी उमेदीच्या काळात रात्रीचा दिवस केला. घरादाराची कधी परवा केली नाही. पूर्वी जिथे कोठे भाजपचे नाव नव्हते. अशा दुर्गम भागात पक्षाचा झेंडा रोवला. अशा भागात पक्षाची ताकद वाढविली. आणि त्या बळावर पक्ष आता अत्युच्च स्थानी पोहचला आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी हे अथक प्रयत्न केले आहेत. त्यांची कदर करण्याऐवजी अलीकडेच पक्षात आलेल्या आयारामांना मानाची पदे देऊन विद्यमान भाजप पदाधिकारी निष्ठावान, जुन्या जाणत्यांची कोंडी करीत आहेत. त्यांना पक्ष बैठका, महत्त्वाच्या निर्णयांपासून दूर ठेवीत आहेत’, अशी खंत उपस्थित जाणत्यांनी बैठकीत व्यक्त केली. या बैठकीचा वृत्तांत एका जाणत्या भाजप कार्यकर्त्यांने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिला. ‘एक व्यक्ती एक पद’ ही भाजपची कार्यप्रणाली आहे. आता तर सर्व पदे भाजप खासदार, आमदार, प्रदेश नेते, मुख्यमंत्री कार्यालयाशी सलगी असलेल्या ‘मोजमाप’ नसलेल्या, पक्षाला ‘बाहुबळ’ देणाऱ्या कार्यकर्त्यांला दिली जातात. अनेक पदे एका व्यक्तीकडे दिली तर ती व्यक्ती त्या पदाला न्याय देते का, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करणे आवश्यक आहे. एकीकडे पक्ष राज्याराज्यांत वाढविण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्याच बरोबर ज्यांनी पक्ष वाढविण्याठी स्थानिक पातळीवर जीवाचे रान आणि रक्ताचे पाणी केले. त्यांची कदर पक्ष नेतृत्व करणार की नाही, असे प्रश्न या बैठकीत नाराज मंडळींनी उपस्थित केले.ज्या त्यागाने आणि पावित्र्याने भाजपने वाढीसाठी वाटचाल केली ती टिकविणे महत्त्वाचे आहे. केवळ आयारामांनी पक्षातील खोगीर भरती वाढेल; पण जे पावित्र्य आहे ते असणार नाही, असाही सूर पक्षात घेण्यात येत असलेल्या गुन्हेगार मंडळींच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त करण्यात आला. शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवलीत निष्ठावान भाजप कार्यकर्ते पक्ष विचारत नसल्याने बाजूला पडले आहेत. त्यांचा विचार पक्षाने केला नाही तर त्याची किंमत पक्षाला मोजावी लागेल, असा सूर यावेळी आळविण्यातआला.