डोंबिवलीकर राजन मुकादम यांचे संशोधन
‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विविध कंपन्यांनी भारतातील विविध क्षेत्रांत आर्थिक गुंतवणूक केली असल्याचे आपण पाहिलेच आहे. मराठी तरुणांनीही व्यवसायात उतरून या क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवावा यासाठी डोंबिवलीतील राजन मुकादम यांनी पुढाकार घेत विदा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. मुकादम यांनी बॅटरी तसेच सौरऊर्जेवर चालणारे वाहन बनवले असून याचा उपयोग लघुउद्योग क्षेत्रातील उद्योजकांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
डोंबिवलीतील राजन मुकादम यांनी हे वाहन बनवले आहे. याची ६०० किलो वजन पेलण्याची क्षमता आहे. तर दर ताशी वेग २५ किलोमीटर आहे. विजेची कमतरता आज ना उद्या आपल्याला जाणवणार आहे, त्यावर उपाय म्हणून सौरऊर्जेचा पर्याय आपण शोधला. परंतु या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून शक्य होईल तेवढी वीज, इंधन बचत करण्याचा प्रयत्न आपण सर्वानी केला पाहिजे असे डोक्यात होते. त्यातूनच सौरऊर्जेवर चालणारे वाहन बनवावे अशी कल्पना सुचली. शहरात सौरऊर्जा कमी प्रमाणात मिळते. त्यामुळेच त्याचे प्रमाण ३० टक्के आहे. ग्रामीण भागात हीच ऊर्जा आपल्याला ७० ते ८० टक्के मिळते. शहरात सौरऊर्जेचे प्रमाण कमी मिळत असल्याने त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रॉनिक बॅटरीही त्यात बसविली आहे. याचा उपयोग लघुउद्योजकांना होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रत्येकालाच दुकान घेणे परवडत नाही. अशा लघुउद्योजकांसाठी हे वाहन म्हणजे फिरते दुकान आहे. शिवाय पालिकेला कचरा उचलण्यासाठीही या गाडय़ांचा उपयोग होऊ शकतो. गल्लीबोळात ज्या ठिकाणी घंटागाडी जाऊ शकत नाही, तिथेही हे वाहन जाऊ शकते. पालिका आयुक्तांना ही संकल्पना मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे काम मी एकटय़ाने केले असले तरी मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे यासाठी मी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने इंडियन मोटार व्हेईकल अ‍ॅक्टमध्ये काही दुरुस्त्या केल्या आहेत, परंतु राज्य सरकारने त्या केल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांना याविषयी पत्रव्यवहार करून याविषयी कळविणार आहोत. जेणेकरून अशा गाडय़ांना आरटीओची मंजुरी मिळून ३० टक्के अनुदानही मिळेल, असेही ते म्हणाले.