ठाणे : ‘व्हॅलेण्टाईन दिना’च्या दिवशी लग्न करून तो क्षण अविस्मरणीय ठेवण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. या वर्षी या दिवशी ठाणे जिल्ह्य़ातील २० जोडप्यांनी नोंदणी विवाहासाठी जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंद केली आहे. यामध्ये कल्याण आणि बदलापूर येथील जोडप्यांची संख्या अधिक आहे. ‘व्हॅलेण्टाईन डे’ हा दिवस जगभर प्रेमाचा दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू देऊन हा दिवस अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतो. याच दिवसाच्या निमित्ताने अनेक जोडपी लग्नाच्या बेडीत अडकून हा दिवस अधिक अविस्मरणीय करत असल्याची माहिती ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यंदाच्या व्हॅलेण्टाईन दिनाला विवाह करण्यासाठी २० जोडप्यांनी नोंदणी केली असल्याची माहीती ठाणे जिल्हाधिकारी विवाह नोंदणी कार्यालयाचे अधिकारी अनिल गायकवाड यांनी दिली. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्ह्य़ात २३ जोडप्यांनी नोंदणी विवाह केला होता. २०१९ च्या व्हॅलेण्टाईन दिनाला एकूण ३५ जोडप्यांचे नोंदणी विवाह पार पडले होते.