|| मिल्टन सौदिया वसई तालुक्याच्या सौंदर्यस्थळात भर घालणाऱ्या निसर्गरम्य किनाऱ्यांची दुर्दशा झाली आहे. बेकायदा आणि अनिर्बंध रेती उपशामुळे वसईतील किनारे धोकादायक तर बनले आहेतच; पण आता कचऱ्याच्या समस्येने किनारे काळवंडू लागले आहेत. वसई तालुक्याला पश्चिमेकडे नायगावपासून थेट अर्नाळापर्यंत विस्तीर्ण अशी नैसर्गिक सौंदर्याने नटलेली किनारपट्टी लाभली आहे. केवळ वसईतीलच नव्हे तालुक्याच्या बाहेरील पर्यटकही याठिकाणच्या किनाऱ्यांवरील सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी येतात. मात्र, या पावसाळ्यात संपूर्ण किनारपट्टीवर कचऱ्याचे साम्राज्य आढळून येत आहे. हा कचरा उचलला जात नसल्यामुळे किनाऱ्यालगतचा परिसर बकाल होऊ लागला आहे. पाचूबंदर-किल्लाबंदर, अर्नाळा या किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय चालतो. नव्या मासेमारी हंगाला लवकरच सुरुवात होत असून या किनाऱ्यावर मच्छिमारांची मोठी लगबग दिसून येते. मात्र, त्यांनाही मासेमारीशी संबंधित कामे करताना कचरा तुडवत पुढे जावे लागते. पर्यटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. किनाऱ्यावरील काही हॉटेल्स तथा अन्य व्यावसायिक त्यांच्या आस्थापनात निर्माण होणारा कचरा किनाऱ्यावरील कचऱ्यामध्येच टाकतात. याशिवाय काही स्थानिक देखील त्यांच्या घरातील कचराही किनाऱ्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्येच फेकून देतात. हा कचरा कित्येक दिवस उचलला जात नाही. त्यामुळे तो कुजून जातो आणि त्याला दुर्गंधी येते, असे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. राजोडी, कळंब, नवापूर याठिकाणचे किनारे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. मात्र, येथेही किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. अर्नाळा किल्ला, निसर्गरम्य सुरुची बाग, विविध रिसॉर्टस असल्याने वसई आणि मुंबईबाहेरून देखील दररोज शेकडो पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. पर्यटकांची संख्या जसजशी वाढत आहे, तसे या किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्यही वाढत आहे. समुद्रातील कचरा ग्रामपंचायतीतर्फे सामाजिक संघटनांसोबत किनारा स्वच्छता अभियान राबवतो. अपुऱ्या साधनसामुग्री आणि आर्थिक बाबीमुळे वारंवार अभियान राबवणे शक्य होत नाही. गावातील कचरा गोळा करण्यासाठी कचरागाडी फिर त असते. किनाऱ्यावर येत असलेला हा कचरा समुद्रातून येत आहे’’, असे अर्नाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र पाटील पाटील यांनी सांगितले.