वसई-विरार शहरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाच्या पवित्र्यात वसईमध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भोंगळ कारभारामुळे वसईतील रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून वसई-विरारमधील अनेक ग्राहकांना अवाच्या सवा रकमेची वीज बिले येत आहेत. अनेक ग्राहकांनी भरमसाठी वीज बिल येत असल्याबद्दल तक्रारीही केल्या. मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली. वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले, जलदगतीचे वीज मीटर या समस्यांना वीजग्राहकांना सामोरे जावे लागत आहे. यांमुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विजेचा मीटर बंद असल्याची लेखी तक्रार करूनही अनेक महिने त्याची दखल घेतली जात नाही. मीटर बदलून झाल्यावर त्याचा अहवाल पाठवला जात नाही, तर चुकीचे रीडिंग हा त्रास गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जास्त जाणवत असल्याचे वसईकरांचे मत आहे. संगणकीकरणाने काहीही फायदा झाला नसून त्रस्त होऊन सुधारलेले बिल भरले तरी त्याची नोंद नसल्याने पुन्हा दुसऱ्या महिन्यात चुकीचे बिल येत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली आहे. ‘भरमसाट बिले कशी?’ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत पालघर जिल्ह्यातील तब्बल ५० हजार वीजग्राहकांना भरमसाट रकमेची वीज बिले देण्यात आली होती. सदोष वीज मीटरमुळे ग्राहकांना ही बिले येत असल्याची कबुली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. नोएडा आणि हरयाणा येथून मागवलेल्या फ्लॅश कंपनीचे मीटर बोगस असून त्यामुळेच ग्राहकांना भरमसाट बिले येत असल्याचे त्यांनी सागितले होते. त्यानंतर महावितरणने यापूर्वीच सदोष मीटर बदलण्याचे काम सुरू केले होते. परंतु तरीही भरमसाट बिल कशी येतात, असा सवाल वसईकरांनी केला आहे. उन्हाळ्यामुळे एसीचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. अशा मध्ये वीज ग्राहकांना स्लॅब बेनिफिट मिळत नाही आणि वीज बिल जास्त येते. चुकीच्या रीडिंगची तक्रार असल्यास ग्राहकांना बिल कमी करून दिले जाते आणि सदोष मीटर बदलण्याचे काम पूर्ण झाले असून थोडा काही दोष आढळण्याची शक्यता आहे. - विनायक इदाते, उपकार्यकारी अभियंता