आवक घटल्याने भाज्यांच्या दरांत दुप्पट-तिप्पट वाढ बुधवारी मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या शहरांवर भाजीसंकट ओढवले असून जवळपास सर्वच भाज्यांचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात भाज्यांची आवक ७० टक्क्यांनी घटल्याने भाज्यांच्या घाऊक दरांमध्येही वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कोबी, फ्लॉवर या भाज्या १०० रुपये किलो तर काल-परवापर्यंत ३० रुपये किलो असलेला टोमॅटो ६० रुपये किलोंनी विकला जात आहे. शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी पुणे आणि नाशिकमधून भाजीपाल्याचे ट्रक, टेम्पो मुंबई, ठाण्याच्या बाजारांत दाखल झाल्याने गुरुवारी संपाच्या झळा शहरातील नागरिकांना बसल्या नाहीत. शुक्रवारी मात्र, पुणे आणि नाशिकमधून होणारी भाज्यांची आवक पूर्णपणे रोडावली. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचा तुटवडा होऊन दरांत मोठी वाढ झाली. घाऊक बाजारातील भाज्यांचे दर गुरुवारच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. ‘पुणे तसेच नाशीक जिल्ह्यातून वाशीतील घाऊक बाजारात दररोज किमान ५५०-६०० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. शुक्रवारी दुपापर्यंत हा आकडा जेमतेम २०० ते २५० च्या घरात पोहचला,’ असे वाशी बाजाराचे माजी संचालक शंकर िपगळे यांनी दिली. याचा परिणाम किरकोळ बाजारावरही दिसून आला. मुंबईसह ठाणे, कल्याण- डोंबिवली सारख्या उपनगरमध्ये शिल्लक भाजीमालाची चढय़ा दराने विक्री होत आहे. एरवी ३० ते ४० रुपये किलोने मिळणाऱ्या भाज्यांचे दर अचानाक १०० ते १२० रुपये झाल्याने ग्राहकांना घाम फुटला आहे. फ्लावर, कोबी यांसारख्या भाज्या १०० ते १२० रुपये किलो, तर कालपर्यंत २० ते ३० रुपये किलोने मिळणारा टोमॅटो शुक्रवारी ६०-७०-८० रुपये किलोने (आकारानुसार) विक्री केला जात होता. तसेच शिमला मिरचीचा भाव १२० रुपये किलो एवढा वाढला आहे. भेंडी, वांगी, कारली यांसारख्या भाज्यांचे दरही वाढले असून घाऊक बाजारात कांद्याची आवक पुर्णपणे ठप्प झाल्याने किरकोळीत किलोमागे ३० रुपयांनी विकला जात असल्याचे चित्र आहे.