वाडा :  अंबाडी ग्रामपंचायत हद्दीतील उंबरपाडा येथे गेल्या दोन दिवसांत करोनाबाधित दोन रुग्ण आढळल्याने या ग्रामपंचायत क्षेत्रातील भाजीपाल्यासह सर्व प्रकारची दुकाने ३० मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय येथील ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. मात्र असे असताना अंबाडी नाक्यावर असलेले मद्यविक्रीचे दुकान सुरूच असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अंबाडी नाक्यावर  करोनाचा धोका निर्माण झाला असताना हे मद्यविक्रीचे दुकान सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे; विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्या भाजीपाला, किरकोळ किराणा दुकान हे मात्र बंद ठेवले आहेत, ग्रामपंचायत अंबाडीचे ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मद्यविक्रीचे दुकान बंद करण्याबाबत नोटीस देऊनही  मालक नोटीस स्वीकारत नसल्याने शनिवारी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत प्रशासनाने जाऊन दुकानाला नोटीस चिकटवून पंचनामा केला. याबाबत प्रशासनाने  गंभीर दखल घेऊन तातडीने लाल क्षेत्र जाहीर करावे आणि आवश्यक ती काळजी घेऊन गर्दी होणार नाही याची खबरदारी बाळगावी अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशारा श्रमजीवीचे पदाधिकारी प्रमोद पवार यांनी दिला आहे.

करोना विषाणूचा अधिक संसर्ग  होऊ  नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत परिसरात पूर्णत: टाळेबंदी सुरू  केली आहे. या टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तालुका आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरणकडे तक्रार केली आहे.

– दिलीप जाधव, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अंबाडी