विरारच्या स्कायवॉकवर पादचाऱ्यांची कुचंबना वसई : विरार येथील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना त्रास होऊ नये यासाठी बांधण्यात आलेल्या स्कायवॉकवर पादचाऱ्यांपेक्षा प्रेमीयुगुलांचा वावर मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे या स्कायवॉकचा वापर करणे येथील पादचारी टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. वसई आणि विरार स्थानकाजवळ कोटय़वधी रुपये खर्चून ‘एमएमआरडीए’ने स्कायवॉक बांधले. रेल्वे स्थानकांजवळ अरुंद रस्ते असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. परिणामी पायी चालणाऱ्यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यावर उपाय म्हणून विरार पूर्व तसेच पश्चिम येथे स्कायवॉक बांधण्यात आले. याचा फायदा पादचाऱ्यांपेक्षा जास्त तरुण-तरुणी घेत आहेत. अनेक तरुण-तरुणी या स्कायवॉकवर दिवस-रात्र घिरटय़ा मारताना दिसतात. पादचाऱ्यांसाठी प्रेमीयुगुलांचे चाललेले चाळे त्रासदायक ठरत आहेत. सकाळी रेल्वे स्थानक गाठण्यासाठी स्कायवॉकवरून जावे लागते. मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत येथे अनेक जोडपी उभी असतात. आपल्या बाजूने कोणी जात आहे याचेही भान या जोडप्यांना नसते. त्यामुळे आम्हा पादचाऱ्यांची, मुख्यत: महिला वर्गाची कुचंबणा होत असल्याची प्रतिक्रिया रमेश शर्मा यांनी व्यक्त केली.