ठाणे महापालिका शाळांमध्ये भावी पिढीला घडविण्याचे काम करणाऱ्या सुमारे १८ टक्के शिक्षकांना स्वरयंत्राचा (घसा) विकार झाल्याची धक्कादायक माहिती एका तपासणी शिबिराच्या अहवालातून पुढे आली आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के शिक्षकांना या विकारामुळे कर्करोगाचा धोका असल्याने त्यांना शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शाळेतील वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने शिक्षकांना सातत्याने मोठय़ा आवाजाच्या पातळीत अभ्यासक्रम शिकवावा लागतो आणि विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमाच्या निमित्ताने सतत संवाद साधावा लागतो, अशी कारणे शिक्षकांना स्वर यंत्राचे आजार जडण्यामागे असल्याचे उघड झाले आहे.ठाण्यातील व्हॉइस क्लिनिकच्या डॉ. सोनाली लोहार आणि कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. आशीष भूमकर यांनी महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी ‘आवाज समस्या’ या विषयावर नुकतेच शिबीर घेतले. या शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे ११०० शिक्षकांना आवाजाची काळजी कशी घ्यावी, या विषयी डॉ. सोनाली लोहार यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आशीष भूमकर, डॉ. कमल परसराम, विवेक पाटील, डॉ. विवेक जाधव, हितेश छाडवा, डॉ. बुधलानी आदींनी मार्गदर्शन केले. या शिबिरात ११०० शिक्षकांच्या कान, नाक आणि घसा आदीची तपासणी करण्यात आली आणि स्वरयंत्राचे (घसा) विकार जडू नये म्हणून या तपासणीदरम्यान औषधोपचाराचा सल्लाही देण्यात आला. या शिबिरामध्ये शिक्षकांकडून एक अर्ज भरून घेण्यात आला. त्यामध्ये शिक्षकांना कान, नाक आणि घसा यासंबंधी जाणवणाऱ्या आजाराची माहिती घेण्यात आली. सुमारे ११०० पैकी दोनशे शिक्षकांनी कान, नाक आणि घश्याचे आजार वारंवार उद्भवत असल्याची माहिती अर्जात दिली असून त्यानुसार या शिक्षकांचे तपासणी अहवाल तपासण्यात आले. त्यामध्ये या शिक्षकांना स्वरयंत्राचे (घसा) विकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, असे डॉ. सोनाली लोहार यांनी सांगितले.स्वरयंत्राचा विकार१८ टक्के शिक्षकांना स्वरयंत्राचा विकार जडला असून त्यापैकी सात ते आठ टक्के शिक्षकांमध्ये हा विकार गंभीर स्वरूपाचा आढळून आला आहे. यामुळे या शिक्षकांना कर्करोगाचा धोका असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, असे डॉ. लोहार यांनी सांगितले. तसेच उर्वरित शिक्षकांमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून आली असून त्यांना औषधे देण्यात आली आहेत. शाळेतील वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने शिक्षकांना सातत्याने मोठय़ा आवाजाच्या पातळीत शिकवावे लागते. यामुळे अनेकदा त्यांचा आवाज बसतो किंवा आवाजात बदल होतो. मात्र, स्वरयंत्र विकाराविषयी फारशी जनजागृती नसल्याने शिक्षक तपासणी करून घेत नाही आणि वारंवार उद्भवणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करतात.