स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासनाचा प्रयत्न; महाविद्यालय निवासीपत्रही नोंदणीसाठी ग्राह्य़ धरणार

ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात सोमवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तरुणांना मतदान ओळखपत्रांचे वाटप केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तरुणांना मतदान ओळखपत्र प्राप्त करून घेण्याविषयी माहिती दिली. केवळ रहिवासी दाखला सदर करून किंवा महाविद्यालयाने निवाससंदर्भात दिलेले पत्रदेखील नोंदीसाठी ग्राह्य़ धरले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्य़ांमध्ये युवकांची मतदान यादीमध्ये नोंदणी वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्याच प्रमाणे ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिकांच्या त्याचप्रमाणे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जोशी-बेडेकर महाविद्यालयामध्ये मतदान नोंदणी ओळखपत्र वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील १०० तरुणांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्रे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वाहन असो किवा नसो, वाहन परवाना काढण्यासाठी तरुणांची जितकी उत्सुकता असते तेवढीच उत्सुकता राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी दाखविली पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेऊन वाहन परवाना देण्यापूर्वी संबंधित युवकाकडे मतदार नोंदणी ओळखपत्र आहे का, याची खात्री करून घेण्याची संकल्पना राबवण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ात १८ विधानसभा मतदार संघात ५६ लाख ४ हजार ७१५ मतदार असून ४६ लाख ८ हजार ४४२ मतदारांचे छायचित्राची नोंद करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नेमण्यात येत आहे.

तरुण मतदारांची संख्या कमी..

ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेले १८ ते २० वयोगटातील केवळ ५९ हजार ७२९ मतदार आहेत. जिल्ह्य़ातील एकूण मतदार ५६ लाख ४ हजार ७१५ इतकी असून त्या तुलनेत तरुण मतदारांची संख्या खूप कमी आहे.

मतदार नोंदणी कार्यक्रम..

राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण कार्यक्रम १ मार्च २०१६ पासून सुरू झाला असून तो ३१ ऑगस्टपर्यंत राबवण्यात येणार आहे. ईआरएमएस प्रणालीत अर्ज १६ भरल्यास ८ दिवसांत नोंदणी होऊन ओळखपत्र मिळू शकते, असे सांगितले. ठाणे तहसील कार्यालय तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयांत मतदार नोंदणीसाठी नमुना ६ व ७ भरता येऊ  शकेल, असे त्यांनी सांगितले. १ जानेवारी २०१७ हा मानीव दिनांक असून या दिवशी ज्याला वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी नाव नोंदणी करावी. त्यांना नोंदणीची मदत करण्यासाठी १८ मध्यवर्ती केंद्रे ठाण्यात तयार असून thaneelection.com dIYaUF  ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.