बारवी पट्टय़ातील आदिवासी पाडय़ांत भीषण पाणीटंचाई

गेल्या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे धरणे भरल्याने राज्यातील शहरी भागावरील पाणीसंकट दूर झाले असले तरी, धरणांच्या परिसरात असलेल्या दुर्गम भागातील गावपाडे मात्र यंदाही तहानलेले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील बारवीसह अन्य धरणांच्या परिसरात असलेल्या आदिवासी पाडय़ांत मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाण्यासाठी दाहीदिशा हिंडण्याची वेळ आली आहे. लव्हाळी, चरगाव या पाडय़ांत तर हंडाभर पाणी मिळवणे दुरापास्त झाले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील धरणांपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या आदिवासी पाडय़ांत मेच्या सुरुवातीलाच पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. चरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात नऊ  पाडे येतात. त्यात बहुतांश पाडे आदिवासीबहुल असून तेथे पाण्यासाठी मेच्या सुरुवातीपासूनच पाण्यासाठी आदिवासींना वणवण फिरावे लागते आहे. म्हसा मार्गावर असलेल्या लव्हाळी आदिवासी पाडय़ात पाण्याची परिस्थिती बिकट आहे. पाडय़ात असलेली एक विहीर आता पूर्णपणे आटली असून विहिरीच्या तळाशी असलेले थोडे पाणी मिळविण्यासाठी आदिवासींना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. त्यातही येथील पाणी अशुद्ध असल्याने आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या एकाच कूपनलिकेवर संपूर्ण आदिवासी पाडय़ाची मदार आहे. मात्र याचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे गावकरी सांगतात. पाण्याला एक प्रकारचा वास आणि चिकटपणा असल्याने ते पाणी पिणे शक्य नसल्याचे श्रीपत बंगारे सांगतात.

पाडय़ाच्या आसपास काही किलोमीटरवर एक तलाव आहे. मात्र तो खूप दूर असल्याने तेथे जायचे म्हटले की अर्धा दिवस वाया जातो. त्यामुळे कधीतरी कपडे धुण्यासाठी तेथे जातो असे सखाराम हिंदोळे सांगतात. पाडय़ात काही शेतघरे आहेत. तिथे मात्र मुबलक पाणी उपलब्ध आहे. येथील पाण्यावर कधी कधी आदिवासींची गुजराण होते. मात्र हे पाणी नेहमी मिळत नसल्याने आदिवासींना मोठी पायपीट करावी लागते आहे.

चरगाव येथेही काही वेगळी परिस्थिती नाही. गावातील पाणीपुरवठा योजना विजेअभावी बंद पडली असून पाण्यासाठी गावातल्या विहिरीवर अवलंबून राहावे लागते आहे. विहिरीच्या पाण्याची पातळीही खालावली असून येत्या आठवडाभरात येथील पाणीही संपेल, अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथील पाणी प्रश्नही गंभीर होणार आहे. त्यामुळे किमान पिण्यायोग्य पाणी तरी उपलब्ध व्हावे अशी मागणी आता येथील ग्रामस्थ करत आहेत.

विशेष बाब म्हणजे चरगाव आणि आसपासच्या आदिवासी पाडय़ांपासून अवघ्या काही किलोमीटरवर ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आहे. मात्र या पाण्याचा या आदिवासी पाडय़ांना काहीही उपयोग होत नाही. कोणत्याही पाडय़ात पाणीपुरवठा योजना यशस्वी झालेली नाही.

रात्र पाण्याची आहे

पाण्यासाठी आदिवासींना विविध शेतघरे आणि कूपनलिकेवर अवलंबून राहावे लागते. अनेकांची पहाट मुळात यासाठीच होते.  दुपारनंतर उन्हाचा कडाका वाढल्याने अनेकजण सायंकाळी पाणी भरतात. मात्र तेव्हा गर्दी होत असल्याने अनेक आदिवासी रात्री उशिरा पाणी भरतात.

आवश्यक असलेल्या ठिकाणी टँकरनेही पाणीपुरवठा केला जाईल. ग्रामसेवकांनी प्रस्ताव पाठवल्यास प्रक्रिया जलद होईल.

प्रशांत जोशी, अंबरनाथ तहसीलदार