कल्याण/ ठाणे : जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी तब्बल ४० तासांपासून बंद ठेवलेला पाणीपुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) शनिवार सकाळपासून कमी दाबाने सुरू केला. मात्र, सायंकाळच्या वेळेत कल्याण-शीळ मार्गावरील खिडकाळीजवळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. परिणामी ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेटमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार असून या ठिकाणी महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. कल्याण, डोंबिवली एमआयडीसी, २७ गाव परिसर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरच्या काही भागांचाही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि तळोजा परिसराचाही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे , एमआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी दुपापर्यंत दुरुस्तीकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.