गणपती बाप्पा मोरया अशा गजरात बाप्पाचे मोठय़ा भक्तिभावाने आगमन होते. रांगोळ्याच्या पायघडय़ा आणि हार-फुलांच्या सजावटीने भाविक मनोभावे गणपतीची पूजा करतात. आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत अनेकांचे डोळे पाणावतात. विसर्जन करून भाविक घरी परततात. मात्र विसर्जनानंतर नदीच्या काठावर अस्ताव्यस्त पडलेल्या गणपती-गौरीच्या मूर्ती नजरेस पडल्या की पुढल्या वर्षी बाप्पाचे खरेच आनंदाने पुनरागमन होईल का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एकीकडे गणपतीची भक्तिभावाने पूजा करायची आणि दुसरीकडे नदीकिनारी मूर्तीचे ढीग, रस्त्यावर इतरत्र निर्माल्य टाकून विधात्याने साकारलेल्या त्या निसर्गाचेच विद्रूपीकरण करत असल्याची जाणीवही मनात नसावी, इतकी भाविकांची संवेदनशीलता बोथट झाली आहे का?