प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडून बैठक, पाहणी ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर आणि वसई या शहरातील सार्वजनिक वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाण्याला केंद्रस्थानी ठेवून खाडीमार्गे जलवाहतुकीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्षा नूतन गुहा बिश्वास यांनी शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक घेऊन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर या प्रकल्पातील वसई-ठाणे- कल्याण या जलमार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर आणि वसई या शहरांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून या वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर प्रवाशांचा भार वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन या शहरांतील खाडीमार्गावर जलवाहतूक प्रकल्प सुरू करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेतला होता. यासंदर्भात आयुक्त जयस्वाल यांनी खासदार राजन विचारे, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे आणि तत्कालीन महापौर संजय मोरे यांच्यासोबत केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाविषयी चर्चा केली होती. या बैठकीत पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई कल्याण तर दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या मार्गाबाबत चर्चा झाली होती. त्यापैकी पहिल्या जलमार्गाला तत्त्वत: मान्यता देऊन या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश जलवाहतूकमंत्री गडकरी यांनी दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने सल्लागार नियुक्त करून या प्रकल्पाचा अंतरिम अहवाल गडकरी यांना सादर केला होता. त्यावेळेस या प्रकल्पासाठी लागणारा निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, भारतीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाच्या अध्यक्षा नूतन गुहा बिश्वास यांनी शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी जलवाहतूक प्रकल्पाची माहिती दिली. या बैठकीमध्ये नूतन बिश्वास यांनी जलवाहतूक प्रकल्पाचे सादरीकरण पाहिले आणि या प्रकल्पासंबंधित असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जलमार्गाची पाहणी करून या प्रकल्पाची शक्यता तपासून समाधान व्यक्त केले.