जलवाहिनीची झडप तुटली; दोन दिवस कमी दाबाने पाणी ठाणे : ठाणे महापालिकेच्या पिसे येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा झडप (वॉल्व्ह) रविवारी रात्री तुटली. त्याच्या दुरुस्ती कामामुळे शहराचा पाणीपुरवठा सोमवारी दिवसभर बंद होता. यामुळे ठाणे शहर, घोडबंदर, कळवा आणि मुंब्य्रातील काही भागांतील पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊन नागरिकांचे हाल झाले. तसेच या बंदमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांना आणखी दोन दिवस टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दररोज विविध स्रोतांमार्फत ४८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेसाठी महापालिकेच्या पिसे येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी उचलण्यात येते. या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची झडप रविवारी रात्री तुटली. त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले. त्यासाठी महापालिकेच्या योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. सोमवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. तोपर्यंत महापालिकेच्या योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंदच होता. अचानक ही परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांची कैरसोय झाली. चोवीस तास पाणी बंद असल्यामुळे येथील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्ती काम पुर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या भागात पाणी टंचाई घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा- कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याचा काही भाग, आझादनगर, डोंगरीपाडा या परिसरात पाणी न आल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. काही भागाला दिलासा दरम्यान, महापालिका योजनेचा पाणीपुरवठा बंद असला तरी या काळात मात्र एमआयडीसी, स्टेम आणि मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू होता. त्यामुळे शहराच्या काही भागांतील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.