करोना परिस्थितीमुळे पत्रिका छपाईत ८० टक्क्यांची घट ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असतानाच, आता करोनाच्या काळात लग्न सोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या र्निबधामुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. यापूर्वी तीनशेहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात होती. मात्र, आता केवळ ३० ते ४० पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे. करोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच लग्न कार्यक्रम साजरे करण्यावर र्निबध आले आहेत. यामुळे पूर्वीसारखे मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम होत नसल्यामुळे त्याच्याशी संबंधित अनेक व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. लग्न सोहळ्यावर विविध व्यवसाय अवलंबून असून सध्या लग्न सोहळा साध्या पद्धतीने होत आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केवळ २० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करण्यास राज्य शासनाने सुरुवातीला परवानगी दिली होती. त्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका लग्न सोहळ्यावर अवलंबून असलेल्या कॅटर्स, पत्रिका छपाई, सभागृह, मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक अशा सर्वच व्यवसायांना बसला. टाळेबंदीपूर्वी एका लग्न सोहळ्यासाठी ३०० हून अधिक लग्नपत्रिका छपाई करण्याची ऑर्डर वधू आणि वराच्या कुटुंबीयांकडून दिली जात होती. मात्र, लग्नाला उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने अनेक जण समाजमाध्यमांवरून ठरावीक वऱ्हाडींना लग्नाचे निमंत्रण देत होते. तसेच सप्टेंबर महिन्यानंतर टाळेबंदी आणखी शिथिल करण्यात आली. त्यात लग्न सोहळ्याकरिता ५० वऱ्हाडींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे वर आणि वधूच्या कुटुंबांकडून केवळ ३० ते ४० पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. समाजमाध्यमांवरून निमंत्रण पत्रिका पाठवण्यावर भर करोनामुळे लग्न सोहळा ठरावीक वऱ्हाडींच्या उपस्थितीत पार पडत असल्याने अनेक जण मित्रमंडळींना किंवा परिचितांना लग्नाचे निमंत्रण पत्रिकेद्वारे देण्याऐवजी समाजमाध्यमांद्वारे देत आहेत. करोनामुळे प्रत्येकावरच आर्थिक संकट ओढावले आहे. तसेच वऱ्हाडीच्या संख्येवरही र्निबध आहेत. त्यामुळे २० ते ३० पत्रिका छपाई करण्याऐवजी अनेक जण लग्नाचे निमंत्रण पाठवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. करोनाच्या काळात लग्नपत्रिका छपाई व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. कमी वऱ्हाडींमध्ये लग्न सोहळे पार पडत असल्यामुळे अनेक जण लग्नाचे निमंत्रण हे समाजमाध्यमांद्वारे दिले जात आहे. शैलेश गांधी, लग्नपत्रिका, व्यापारी, ठाणे