तहान लागल्यावर विहीर खोदू नये, असे म्हणतात. भविष्यातील पाणीप्रश्न मिटावा, यासाठी आधीच तजवीज केली पाहिजे, असा या म्हणीचा अर्थ. ठाणे, कल्याण परिसरात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या विहिरी या त्यासाठीच खोदलेल्या आहेत. पण वाढत्या नागरीकरणामुळे पाणीपुरवठय़ाची साधनेही बदलली. आता घरोघरी नळाद्वारे पाणी येत असल्याने विहिरींमधून पाणी काढण्याच्या फंदात कोण पडणार. त्यामुळे विहिरींकडे नागरिकांचे आणि त्याचबरोबर प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे एकेकाळी मुख्य जलस्रोत असलेल्या या जीवनवाहिनीची पार रया गेली आहे. देखभाल-दुरुस्तीअभावी त्यांची पडझड झाली आहे, काही विहिरींवर झाडे-झुडपे उगवली आहेत, तर काही विहिरी कचरा टाकण्याची साधने झाली आहेत. काही विहिरींची तोंडे तर काँक्रीट टाकून बंद करण्यात आली आहेत, तर काही चक्क बुजविण्यात आल्या आहेत. मात्र तरीही अद्याप महानगरांमध्ये जुन्या संस्कृतीच्या खुणा जपत अजूनही काही विहिरी पाणी बाळगून आहेत. अगदी एप्रिल-मे महिन्यातही त्यांचा तळ दिसत नाही. आता शहरातील वाढत्या लोकसंख्येला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा जसा कमी पडू लागला, तसे पुन्हा एकदा या परंपरागत जलस्रोताकडे लोकांचे लक्ष गेले आहे. उशिराने का होईना, जुने ते सोने या न्यायाने हक्काच्या पाणीपुरवठय़ासाठी पुन्हा एकदा विहिरींमध्ये पाहिले जात आहे.दीपक जोशी