वनविभागाने उभारलेल्या संरक्षक भिंतीमुळे वन्य प्राण्यांचा वावर वाढला मानवी अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस विरळ होत चाललेले येऊरचे जंगल वन्य प्राण्यांसाठी धोक्याचा अधिवास ठरू लागले होते. त्यामुळेच येथील वन्य प्राण्यांची संख्या कमालीची घटू लागली होती. या पाश्र्वभूमीवर वनविभागाने जंगलाची हद्द निश्चित करणारी संरक्षक भिंत उभारली. याचा परिणाम आता दिसू लागला असून गेल्या काही वर्षांत जंगलाच्या बाह्यभागातून आतील घनदाट जंगलाच्या आश्रयाला गेलेले सांबरांचे कळप, बिबटे, मोर, रानडुक्कर हे वन्य प्राणी आता पुन्हा एकदा येऊरच्या वनसीमेवर मुक्तपणे संचार करू लागले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मानवी हद्द यांना विलग करणारी संरक्षक भिंत बांधण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून वन विभागाच्या माध्यमातून होत आहे. अडीच मीटर उंचीची भिंत आणि त्यावरील सुमारे १.६५ मीटर उंचीच्या लोखंडी तारा यामुळे जंगल आणि मनुष्य वस्ती यांच्यातील संपर्क आता तुटला आहे. त्यामुळे जंगलाच्या भागात सांबरांचा वावर पुन्हा वाढू लागला आहे. आतापर्यंत डीएसपी प्रवेशद्वार ते तमनई नाला येथे ही संरक्षक भिंत बांधली गेली आहे. तसेच सदानंद आश्रम ते एअर फोर्स येथे भिंत बांधण्याचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, ज्या ठिकाणी भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी सांबरांचे कळप दिसू लागल्याचे वन्यप्रेमींच्या पाहणीत आढळले आहे. सांबर, भेकर हे प्राणी मुळातच घाबरट आणि लाजाळू असल्याने मानवी वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी ते फिरकत नाहीत. पूर्वी केवळ रात्रीच्या वेळेत येऊर जंगलाकडे वळणारे सांबर आता दुपार आणि संध्याकाळच्या वेळेतसुद्धा जंगलात हजेरी लावतात. वनविभागातर्फे बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे पाटोणापाडा ते घोडबंदर परिसर येथे सांबर, भेकर मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत, असे निसर्गमित्र मितेश पांचाळ यांनी सांगितले. संरक्षक भिंतीमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मानवी हद्द यांची सीमा संरक्षक भिंतीमुळे निश्चित होण्यास मदत झाली आहे. सीमानिश्चितीमुळे जंगलात होणारे अतिक्रमण रोखण्यास सोईचे ठरेल. मानवी हस्तक्षेपाला आळा बसल्यामुळे जंगलातील प्राण्यांचा अधिवास वाढीस लागला आहे, असे वनविभागातर्फे सांगण्यात येत आहे.