केंद्र सरकारने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिकांकडे पैसेच नसल्याने ऐन हिवाळ्यात उबदार कपडय़ांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहक वळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वेटर, जॅकेट्स, शाल या गरम कपडय़ांचा व्यवसाय ‘थंडा’वला आहे.

[jwplayer zVOMyVTv]

सध्या हिवाळी हंगामाला प्रारंभ झाला असताना थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिक उबदार कपडय़ांची खरेदी करतात. मात्र विक्रेत्यांकडून ५०० व १००० च्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने आणि ग्राहकांकडेही सुटे पैसे नसल्याने उबदार कपडय़ांची विक्री मंदावली आहे. स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी आदी मालाच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहक कमी झाल्याचे चित्र आहे. बँकेतून मोजकेच आणि मोठय़ा मूल्यांचे पैसे दिले जात असल्याने ग्राहकांकडे नोटांची चणचण भासत आहे. त्यातच मोठय़ा मूल्याच्या नोटांचे सुटे पैसे नसल्याने उबदार कपडय़ांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

विक्रेत्यांची नाराजी

स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी आदी मालाच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची दरवर्षी झुंबड उडते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. तालुक्यातून विक्रीसाठी येणारा माल हा पंजाबवरून येतो. परंतु सुरुवातीला हा माल उधारीवर आणला जातो. पुढे संबंधित माल उत्पादकाकडून महिनाभरानंतर मालाची उधारी वसूल केली जाते. माल उत्पादकाचे प्रतिनिधी वसुलीसाठी येतात. मात्र यंदा चलनबंदीमुळे काहीच पदरात न पडल्याने वसुलीवाल्यांना द्यायचे तरी काय, असा प्रश्न या सामान्य विक्रेत्यांना पडला आहे. आणखी काही काळ असेच चित्र राहिल्यास या विक्रेत्यांना पुन्हा आपापल्या गावी परतावे लागणार आहे.

[jwplayer y8Pn2zMM]