अंबरनाथमध्ये शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे मूळ गाव असलेल्या जळगाव जिल्ह्य़ातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही संताप अनावर झाला. गुंजाळ हे अंबरनाथमध्ये शिवसेनेचे नगरसेवक असताना जळगाव जिल्ह्य़ाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुखही होते. जळगावच्या या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सोमवारी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सामोरे जावे लागले. अखेर ठाण्यातील पोलिसांनी उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांना पाचारण केल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हत्येत सहभागी असणाऱ्या उर्वरित मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. अंबरनाथ येथील मोरिवली परिसरात राहणारे शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांची २५ डिसेंबर रोजी पश्चिमेकडील मोरिवली परिसरात हत्या केली होती. यावेळी मोरिवली येथील अनेकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपींना पकडण्याची मागणी केली होती. हत्येच्या चार दिवसांनंतर टिटवाळा पोलिसांनी गुन्हय़ातील चार आरोपीना अटक करून अंबरनाथ पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पण पोलिसांनी एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्हय़ातील उर्वरित मारेकऱ्यांना शोधून काढण्यास अंबरनाथ पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप करत जळगांव व चाळीसगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन गुंजाळ यांच्या मारेकऱ्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्याला घेराव घातला.