मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘सेंद्रीय शेती ही काळाची गरज’ असा संदेश देत नुकताच जागतिक कृषिदिन साजरा केला. खुटल येथे कृषिदिनानिमित्त कृषी दिंडी व वृक्षारोपणचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुरबाड तालुक्याचे कृषी अधिकारी कांबळे, कृषी पर्यवेक्षक सुरोशे, पोलीस उपनिरीक्षक पकंज गिरी, प्रशासकीय अधिकारी किरण वायभट, सरपंच जयाबाई वाघ आणि कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सरोदे यावेळी उपस्थित होते.
अलीकडच्या काळात रासायनिक घटकांच्या प्रभावामुळे शेतकरी याच प्रकारची शेती करू लागले आहेत. प्रत्यक्षात ते आरोग्य तसेच जमिनीस हानीकारक आहे. काही शेतकरी सेंद्रीय पिके घेतात, पण त्यांना मार्केटींग जमत नाही. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले पीक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुरबाड तालुका कृषी अधिकारी कांबळे यांनी केले. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी यापेक्षा सेंद्रिय पदार्थ कसे विकावेत, त्याचे वेगळे मार्केट कसे तयार होईल, हे पाहणे गरजेचे आहे. असे मत प्राचार्य सरोदे यांनी यावेळी मांडले. सेंद्रीय शेतमालास चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, रासायनिक खते, किटकनाशके यावरील खर्चाची बचत होईल, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.