ठाण्यातील ‘समता विचार प्रसारक मंडळ व ‘साद’ फाऊंडेशनच्या युवा कार्यकर्त्यांचा स्तुत्त्य उपक्रम आषाढ अमावास्येच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या ‘गटारी’ सणाच्या निमित्ताने मद्यपान आणि मांसाहाराच्या पाटर्य़ा झोडण्यामध्ये अनेक मंडळी दंग असताना ठाणे परिसरातील काही तरुण मंडळींनी विधायक ‘गटारी’ साजरी केली. ठाण्यातील समता विचार प्रसारक मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी येऊर परिसरात वृक्षारोपण करून गटारी साजरी केली. तर त्याचवेळी ‘साद’ फाऊंडेशनच्या युवकांनी वांगणी येथील पर्यटनस्थळ असलेल्या धबधब्यांच्या काठावरून दारूच्या बाटल्यांचा कचरा बाहेर काढला. तरुणांच्या या उपक्रमाचे ठाणेकर नागरिकांकडून कौतुक होत आहे. वृक्षारोपण मोहिम येऊरच्या जंगलामध्ये येऊन मद्यपान आणि मांसाहाराच्या पाटर्य़ा झोडण्याचे चित्र एकीकडे दिसून येत असताना दुसऱ्या बाजूला काही तरुण विधायक पद्धतीने गटारी साजरी करत असल्याचे चित्र दिसून येत होते. ठाण्यातील ‘समता विचार मंच’च्या या तरुणांनी सुजाता भारती यांच्या जंगल कॅम्पमध्ये वृक्षलागवड करून गटारी साजरी केली. पावसाला न घाबरता जवळपास ३० झाडे या परिसरात लावण्यात आली. जंगल कॅम्पच्या व्यवस्थापनाकडून त्यांची योग्य ती निगा घेतली जाईल आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांकडूनसुद्धा वेळोवेळी त्यांची देखभाल केली जाईल, असे विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. वांगणीत धबधब्यांची स्वच्छता.. ‘साद’ फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. वांगणी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या बिडीस या गावाजवळ भगीरथी धबधब्यावर स्वच्छतेची मोहीम व प्रबोधनाचे काम रविवारी करण्यात आले. तरुणांनी केलेल्या या कृतीमुळे अनेक पर्यटकांनी त्यांच्या या मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी भगीरथी धबधबा परिसरातील कचरा, दारूच्या बाटल्या उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच येथे आलेल्या प्रत्येक पर्यटकांना स्वच्छता ठेवण्यासाठी विनंती ेकेली. स्थानिकांचाही यास उत्तम पाठिंबा लाभला.