घोडबंदर येथील मानपाडा भागात शुक्रवारी एका रुग्णाला तीन ते चार खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने त्याचा रिक्षातच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथेही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

मानपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाला काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे १ जुलैला त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आलेला नव्हता. मात्र, शुक्रवारी अचानक त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी परिसरातील तीन ते चार खासगी रुग्णालयांत त्याला तपासणीसाठी नेले.

मात्र, या रुग्णालयांनी नातेवाईकांकडून तरुणाचा करोना चाचणी अहवाल मागितला. अहवाल नसल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही. अखेर त्याचे नातेवाईक त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रिक्षातच मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.