तात्काळ उपचारांमुळे आरोग्य यंत्रणा वर्षभर यशस्वी

ठाणे : जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५७ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या महिनाभरात एकही करोना रुग्ण आढळून आलेले नसतानाच त्यापाठोपाठ आता गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये करोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची बाब समोर आली आहे.

करोनाचे वेळीच निदान करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्यामुळेच या गावांमध्ये मृत्यू झाला नसल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्यातील ग्रामीण भागांना बसला होता. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना करण्यात येत होत्या. त्यामुळे गावांमधील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले. त्याचबरोबर करोनाबाबत जिल्हा परिषदेकडून जनजागृती  करण्यात येत होती. त्यास नागरिकांनीही प्रतिसाद दिला. तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी हे गावागावांमध्ये फिरून ताप तपासणी सर्वेक्षण केले.

झाले काय?

ठाणे जिल्ह्यामध्ये करोनामुळे आतापर्यंत १० हजार ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना मृत्यूंच्या आकड्यांचा फेरआढावा घेऊन मृतांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे अनेक महापालिकांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. परंतु ठाणे जिल्ह्यातील १७२ गावांमध्ये अद्याप एकही रुग्ण दगावला नसल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.

गावात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामस्थांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत गावाची काळजी घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांडगे यांनी चाचणी, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि रुग्णावर वेळेत उपचार या आखून दिलेल्या त्रिसूत्रीचे ग्रामस्थांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्यरीत्या पालन केले.

– चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद