उत्तर प्रदेश लखनौहून पुष्पक एक्सप्रेसमधून आलेला मुंबई झवेरी बाजारातील एक व्यापारी टिटवाळा रेल्वे स्थानकात शनिवारी थांबा नसताना एक्सप्रेस हळू होताच फलाटावर उतरला. या व्यापाऱ्याकडे अवजड पिशवी असल्याने फलाटावर गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना संशय आला. त्यांनी व्यापाऱ्याला कार्यालयात नेऊन त्याची चौकशी केली. त्यात एक लाख १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ५६ लाख रुपये किंमतीचे दागिने आढळून आले.

हेही वाचा- मुंबई : गरबा खेळण्यावरुन वाद; टोळक्यांकडून रहिवाशांना मारहाण

एवढा किंमती ऐवज कोणतीही सुरक्षा न घेता, रेल्वे प्रशासनाला कोणतीही माहिती न देता या व्यापाऱ्याने उत्तर प्रदेशातून मुंबईत प्रवास केल्याने रेल्वे सुरक्षा जवान हैराण झाले. रोख रक्कम, दागिन्यांची कागदपत्र, हा ऐवज कुठून आणला आहे. तो कोठे नेला जाणार होता याची माहिती तात्काळ व्यापाऱ्याने पोलिसांना न दिल्याने टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळाच्या वरिष्ठ निरीक्षक अंजली बाबर यांनी वरिष्ठांच्या आदेशावरुन ही माहिती प्राप्तीकर विभागाला दिली. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोख, दागिने ताब्यात घेऊन व्यापाऱ्याची चौकशी सुरू केली आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- डोंबिवलीतील कोपर पूर्वमध्ये नाल्यावरुन प्रवाशांचा धोकादायक प्रवास

जी. पी. मंडल असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. शनिवारी टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान एल. बी. बाग, शुभम खरे गस्त घालत होते. त्या वेळेत उत्तर प्रदेशातून एक्सप्रेस येण्याची वेळ झाली होती. पुष्पक एक्सप्रेस टिटवाळा रेल्वे स्थानकातून जात असताना तिचा वेग कमी झाला. या संधीचा फायदा घेत दरवाजात उभा असलेले व्यापारी जी. पी. मंडल यांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरणे पसंत केले. टिटवाळा रेल्वे स्थानकात एक्सप्रेसला थांबा नसताना एक प्रवासी अचानक का उतरला. त्याच्या खांद्यावर मोठी प्रवासी पिशवी असल्याने गस्तीवरील जवान खेर, बाग यांना संशय आला. त्यांनी मंडल यांच्या दिशेने जाऊन तुम्ही धावत्या एक्सप्रेसमधून का उतरलात. त्यावेळी ते निरुत्तर झाले. मंडल यांच्या जवळ पिशवी असल्याने जवानांना संशय आला. त्यांनी मंडल यांना रेल्वे सुरक्षा कार्यालयात नेले. तेथे वरिष्ठ निरीक्षक अंजली बाबर यांच्या उपस्थितीत मंडल यांची चौकशी करण्यात आली. पिशवीत काय आहे असे विचारल्यावर ते गंभीर झाले. पोलिसांनी त्यांच्या पिशवीची तपासणी केली. त्यातील रोख रक्कम, सोन्याचा ऐवज पाहून पोलीस आश्चर्यचकीत झाले.

हेही वाचा- ठाणे : कशेळी-काल्हेर भागात तीन तासांपासून बत्तीगुल

या ऐवजाची कोणतीही कागदपत्र जवाहिर मंडल दाखवू न शकल्याने पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे दिले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्राप्तिकर विभाग याविषयी अंतीम निर्णय घेईल असे अधिकारी म्हणाला.