ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा ९५.५७ टक्के निकाल लागला आहे. तर, जिल्ह्यातील ४८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला असून कोकण विभागात ठाणे जिल्हा अव्वल ठरला असल्याची माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता १ लाख १३ हजार ३२८ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी बसले होते. यामध्ये ५८ हजार ६३ मुलांचा आणि ५५ हजार २६५ मुलींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ०८ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात,५४ हजार ८७३ मुले आणि ५३ हजार ४३८ मुली आहेत. जिल्ह्यात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून ९६. ६९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ९४. ५० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९५.५७ टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच कोकण विभागातून ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच ४८४ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला असून कोकण विभागात ठाणे जिल्हा अव्वल ठरला आहे. तर, जिल्ह्यातील दोन शाळा अशा आहेत की, त्या शाळांचा शून्य टक्के निकाल लागल्याची माहिती समोर आली आहे.
– ठाणे जिल्ह्यातील टक्केवारी निहाय्य शाळांची संख्या
टक्केवारी – शाळा संख्या
० टक्के – ०२
००१ ते १० टक्के – ००
१०.०१ ते २० टक्के – ००
२०.०१ ते ३० टक्के – ००
३०.०१ ते ४० टक्के – ०५
४०.०१ ते ५० टक्के – ०३
५०.०१ ते ६० टक्के – १६
६०.०१ ते ७० टक्के – ३२
७०.०१ ते ८० टक्के – ५३
८०.०१ ते ९० टक्के – १६६
९०.०१ ते ९९.९९ टक्के – ५२४
१०० टक्के – ४८४