मैत्रिणीच्या वडिलांनी धमकावल्याने भिवंडी येथील नागावरोड भागात राहणाऱ्या लक्ष्मण सुर्यंवशी (२१) या तरुणाने उंदीर मारण्याचे विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लक्ष्मण याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मैत्रिणीच्या वडिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लक्ष्मण हा आई-वडिल आणि तीन भावंडांसोबत राहत होता. याच परिसरात त्याची १३ वर्षीय मैत्रीण राहते. लक्ष्मणच्या कुटुंबियांनी आणि मुलीच्या कुटुंबियांनी दोघांनाही ताकिद दिल्यानंतर लक्ष्मणने त्या मैत्रिणीसोबत बोलणे टाळत होता. मात्र, त्यानंतरही २६ मार्चला मुलीचच्या वडिलांनी लक्ष्मणच्या कानशिलात लगावून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकारामुळे लक्ष्मण हा खूप घाबरला होता. १ एप्रिलला लक्ष्मण हा अचानक घरातून निघून गेला होता. त्याचा मोबाईल फोनही बंद येत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेच्या सुमारास लक्ष्मण हा घरी आला. त्यावेळी त्याच्या हातामध्ये उंदीर मारण्याचे विष होते. त्याच्या आई वडिलांनी विचारले असता, आपण जीवे मारण्याच्या धमकीने घाबरलो असल्याने उंदीर मारण्याचे विष प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागला. लक्ष्मणच्या आई-वडिलांनी तात्काळ त्याला भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यास मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ९ एप्रिलला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी लक्ष्मणच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात लक्ष्मणच्या मैत्रिणीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.