२७ गावांमधील पालकांची अडचण; पालिका अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी

१ जून रोजी २७ गावे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायतीची दप्तरे पालिकेत जमा करण्यात आली आहेत. दरम्यान, गावांमधील ज्या पालकांनी नवजात बाळाच्या जन्म दाखल्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज भरून दिला होता, त्यांचे अर्ज आता पालिकेत वर्ग झाले आहेत. मात्र ग्रामपंचायत कार्यालयांना कुलप असल्याने तेथे माहिती देण्यासाठी आता कुणीही नाही. त्यामुळे २७ गावांमधील काही पालक बाळाचा जन्म दाखला मिळविण्यासाठी पालिकेत फेऱ्या मारीत आहेत. त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे देण्यापलीकडे पालिका कर्मचाऱ्यांकडून काहीही मिळत नाही, अशा तक्रारी काही पालकांनी केल्या आहेत.

बाळाचा जन्म दाखला मिळत नसल्याने आधारकार्ड, पॅनकार्ड, त्याच्या नावाने विमा काढणे, बँकेत बचत खाते काढणे शक्य होत नाही. एका पालकाला येत्या काही दिवसांत दुबई येथे जायचे आहे. पासपोर्टसाठी त्यांना कार्यालयात अर्ज करायचे आहेत. नोकरीच्या ठिकाणी काही माहिती द्यायची आहे. त्यांचीही अडचण जन्म दाखला मिळत नसल्याने झाली आहे, असे काही पालकांनी सांगितले.

पुढाऱ्यांचेही दुर्लक्ष

२७ गावांच्या हक्कासाठी लढणारी संघर्ष समिती, या भागातून निवडून गेलेल्या नगरसेवकांचे या विषयाकडे अजिबात लक्ष नसल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळाच्या जन्मानंतर सहा महिने उशिरा दाखल्यासाठी का अर्ज केला म्हणून पुन्हा पालिका कर्मचारी प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता पालकांना वाटते. त्यासाठी पुन्हा सत्य प्रतिज्ञापत्र जोडा, असे काही खर्चीक विषय पालकांच्या गळ्यात पालिकेकडून मारले जाण्याची भीती या पालकांना आहे.

ग्रा.पं.- पालिकेचे जमेना..

२७ गावांमधून पालिकेत जमा केलेली दप्तरे गुंडाळून ठेवण्यात आली आहेत. ती दप्तरे सोडून पालकांचा आलेला अर्ज शोधणे दिव्य आहे. ग्रामपंचायतींमध्ये संगणकप्रणाली द्वारे बाळाच्या जन्माची नोंदणी केली जात होती. परंतु, ग्रामपंचायतींचे संगणक सॉफ्टवेअर पालिकेच्या सॉफ्टवेअरशी मिळते जुळते नसल्याने ते उघडण्यास तांत्रिक  अडचण आली आहे. त्यामुळे गावांची महत्वाची माहिती संगणकात अडकून पडली आहे,’ असे एका पालिका कर्मचाऱ्याने सांगितले. यासंदर्भात ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्याशी संपर्क साधला, ते परिक्षेत्राच्या बाहेर असल्याचे भ्रमणध्वनीवर सांगण्यात येत होते.

डोंबिवली एमआयडीसीतील एका रुग्णालयात आम्हा दाम्पत्याला मे महिन्यात बाळ झाले. बाळाचा जन्मदाखला मिळण्यासाठी आजदे ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. त्यानंतर एक महिन्यात २७ गावे पालिकेत समाविष्ट झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे दप्तर पालिकेत जमा करण्यात आले आहे. दाखल्यासाठी गेले सहा महिने पालिकेत फेऱ्या मारीत आहेत. परंतु, सात दिवसांनी, दहा दिवसानी अशी साचेबध्द उत्तरे देण्यात येत आहेत.

रिन म्हात्रे, पालक, पाथर्ली