ही कहाणी आहे भक्तीची आणि शौर्याची. दुर्दम्य इच्छाशक्तीची, जाज्वल्य देशप्रेमाची आणि धर्मनिष्ठेची. निश्चयाच्या बळाची. अकराव्या शतकात बिंब राजाने धर्मप्रेमी व शूर, निष्ठावंत राणे घराण्यास अणजूर गाव इनाम दिले होते. क्षात्रतेजाची परंपरा पुढे चालू ठेवणाऱ्या या घराण्यास नाईक ही मानाची पदवी देण्यात आली. तीनशे वर्षांनी काळ पुढे सरकला. वसई व आजूबाजूचा साष्टी बेटांचा परिसर पोर्तुगीजांनी स्वत:च्या अधिपत्याखाली आणला. स्थानिक जनतेस धर्मभ्रष्ट करून बाटवणे, स्त्रियांवर अत्याचार करणे हे नित्याचे झाले होते. सारा कोकण अशा रीतीने स्वधर्मास मुकला जाण्याची भीती निर्माण झाली होती. अशा वेळेस नाईक घराण्याचे वंशज पेटून उठले. निम्बाजी नाईक यांनी तुटपुंज्या सामग्रीनिशी लढा देण्याची तयारी केली व मदतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांकडे विनंती केली. परंतु खुद्द छत्रपतींवर आपत्ती आल्याने हे कार्य अपूर्ण राहिले. हा हेतू साध्य करण्यासाठी ईश्वरालाच साकडे घालायचे ठरवून त्यांचे चिरंजीव श्री.गंगाजी नाईक मोरगाव इथे पायी निघाले. असंख्य अडथळे पार करत कुलदैवत असलेल्या ग्रामी येथे आले. तिथे केलेल्या अनुष्ठानाला दृष्टांतरूपी उत्तर मिळाले आणि ते चिंचवडला रवाना झाले. पूज्य संत मोरया गोसावींचे पणतू यांनी गंगाजींना आपल्या पूजेतील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची मूर्ती अनुग्रहपूर्वक दिली. या प्रसादमूर्तीची स्थापना नाईकांच्या वाडीत झाली. ते वर्ष होते ..१७१८. तीनशे वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली. या वास्तूमुळे गतकाळाच्या वैभव, तत्कालीन समाजजीवन, त्या वेळचा इतिहास, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टींबद्दल कुतूहल जागे होते. त्यामुळे आपोआप इतिहासाचा धांडोळा घेण्याची जिज्ञासादेखील निर्माण होते. त्यामुळेच की काय शालेय वयात कंटाळवाणा आणि नकोसा वाटणारा इतिहास जिवंत करण्याची उत्सुकतादेखील वाढते आणि प्रतिकूल परिस्थितीतही स्वधर्मनिष्ठा आणि देशप्रेम जागृत ठेवणाऱ्या व्यक्तींच्या कथा मनाला स्फूर्ती देऊ लागते. राष्ट्रीय महामार्ग तीनवरून भिवंडी वरून माणकोली गावाकडे रस्ता जातो. तिथून पुढे अणजूर गावाकडे जाता येते. हा सर्व परिसर औद्य्ोगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नेहमीच या भागात वाहनांची वर्दळ असते. हिरवं काही अभावानेच दृष्टीस पडत असल्याने भकास, उजाड भासणाऱ्या कंटाळवाण्या रस्त्याने आल्यानंतर जेव्हा कौलारू छपराची नाईकवाडी नजरेस पडते, तेव्हा चिखलात फुललेल्या कमळाची आठवण होते. खाजगी देवस्थान असल्याने म्हणा वा आपल्याकडची उदासीन मानसिकता म्हणा, हे जतन करण्याजोगं ठिकाण आज आजूबाजूच्या परिसरात कोणालाही फारसे ठाऊक नाही. तिथे जाण्यासंबंधीचे कोणतेही दिशादर्शक नसल्याने अनेकांना त्याविषयीची कोणती माहिती नसल्याचे वास्तव खरोखरच मनाला रुखरुख लावणारे आहे. परंतु माघारी वळताना देवस्थानच्या बाहेरील भिंतीवर असलेल्या कोनाडय़ात उजळलेल्या शांत पणत्या मनाला हुरहुर लावतात, पुन्हा भेट देण्याचे अबोल आर्जव करतात. पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना ही वास्तू तत्कालीन पेशवेकालीन स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. लाकडी तुळया व लाकडी खांबांवर तोललेली इमारत. आताच्या पिढीला कोनाडे, खुंटय़ा माहीत नसेल तर त्यांनी या वाडय़ाची ओटी आर्वजून पाहावी. हत्तीच्या वळलेल्या सोंडेसारख्या पायऱ्यांच्या बाजूचे आधार आणि त्या काळचे वैशिष्टय़पूर्ण नक्षीदार दरवाजे हे बघण्यासारखे आहेत. दरवाजाला फुलांच्या नक्षीची चौकट, वरच्या पट्टीवर सोंड उंचावलेले हत्ती, आडव्या व उभ्या पट्टीवरील सुंदर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजांवर पारंपरिक नक्षीची सजावट आहे. आतल्या दालनात गेल्यावर अणजूरकरांच्या वंशावळीचे चित्र आहे. तत्कालीन काळाचा वेध या चित्रातून घेतला गेला आहे. या दालनाचा बराच मोठा भाग एका सुंदर मोठय़ा लाकडी मखराने व्यापलेला आहे. मखराला महिरपदार कमानी आहेत. या मखराच्या कोपऱ्यांवर पितळी सिंहमुखं बसवली आहेत. आतमध्ये एका भव्य शिसवी चौरंगावर चकाकता पितळी देव्हारा आहे. त्याला कळसही असून त्यात ‘श्री’ सिद्धिविनायकाची देखणी मूर्ती विराजमान आहे. मूर्ती आकाराने फार मोठी नसूनही विलक्षण तेजस्वी आहे. गळ्याभोवती बारीक मोत्यांचे सर आणि वेगळ्या धाटणीचा किरीट या मूर्तीला अत्यंत शोभा देतो. मागे अर्धगोलाकार पितळी महिरप आहे. ही नाईक कुंटुंबाची देवखोली असल्यानी इतरही मूर्ती आहेत. परंतु प्रामुख्याने ‘श्री’ची मूर्ती लक्ष वेधून घेते. कमरेएवढय़ा उंचीच्या पुढे ठेवलेल्या समयादेखील सुंदर आहेत. कसे जाल ठाणे स्थानकाबाहेरून दर तासाभराने सत्याऐंशी नंबरची बस अणजूर येथे देवळापर्यंत जाते. वसई विरार येथून एस. टी.महामंडळाच्या बसेस भिवंडीपर्यंत येतात. भिवंडी ते अणजूर बस सेवा आहे. माणकोलीपासून शेअर रिक्षा मिळतात. खाजगी वाहनेही थेट देवळापर्यंत येऊ शकतात.