किशोर कोकणे ठाणे : राज्यात दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील शिपाई आणि शिपाई चालक या पदासाठी २७३ जागांसाठी २९ हजार ९२५ अर्ज ठाणे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी सरासरी १०० हून अधिक जणांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे. राज्यात करोना प्रादुर्भाव तसेच आरक्षणाच्या मुद्दय़ावर २०१९ मध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. काही दिवसांपूर्वीच रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलीस शिपाई या पदासाठी १४७ आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी १२६ अशा जागांची भरती निघाली आहे. या जागांसाठी २९ हजार ९२५ अर्ज ठाणे पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत. यामधील शिपाई पदासाठी ११ हजार ८७३ आणि चालक शिपाई या पदासाठी १७ हजार ९४९ उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. यापूर्वी मैदानी चाचणी घेतल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती. नव्या भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. अर्जबदल करण्यासाठी मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एसईबीसी प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्जात बदल करण्यास २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार उमेदवारांना महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक बदल करता येणार आहे. तसेच उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी आल्यास १८०० २१०० ३०९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली.