जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवांचे संकेत
अंबरनाथ : शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून जीवन प्राधिकरणाला चार दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला असतानाच आता बदलापूर शहरासाठीही अतिरिक्त पाच दशलक्ष लिटर पाणी देण्याचे संकेत जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. शहरातील पाणी योजनांचा आढावा घेण्यासाठी अंबरनाथमध्ये आले असताना त्यांनी हे संकेत दिले.
अंबरनाथ आणि बदलापूर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढली आहे. त्या तुलनेत पाणीपुरवठय़ाची यंत्रणा सक्षम करण्यात शासकीय संस्थांना यश आले नाही. त्यामुळे गेल्या दशकभरापासून या दोन्ही शहरांमध्ये पाणीप्रश्न गंभीर स्वरूप घेऊ लागला आहे. अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे काम सुरू असल्याने नुकतेच धरण रिकामे केले गेले. त्यामुळे उद्भवलेली तूट भरून काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून चार दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी घेण्यात आले. त्याचा फायदा लवकरच अंबरनाथकरांना होईल. बदलापूर शहरात वाढणारी लोकसंख्या आणि पाणीवितरण यंत्रणा यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे पूर्वेतील शिरगाव, आपटेवाडी या ५० ते ७० हजार लोकसंख्येच्या भागात कायम टंचाई असते. त्यामुळे या भागात अतिरिक्त पाणी द्यावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे. बदलापूर पश्चिमेतही अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. या मागणीला दुजोरा देत उल्हास नदीच्या बॅरेज बंधाऱ्यातून अतिरिक्त ५ दशलक्ष लिटर पाणी देण्याचे संकेत किशोरराजे निंबाळकर यांनी दिले. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार यातील ३ दशलक्ष लिटर पाणी पूर्व भागासाठी, तर २ दशलक्ष लिटर पाणी पश्चिम भागासाठी देण्याचे संकेत निंबाळकर यांनी दिले.
अमृत योजनेची कामे मार्गी लावण्याचे आदेश
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने होऊ घातलेल्या अमृत योजनेची विविध टप्प्यांतली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश किशोरराजे निंबाळकरांनी दिले आहेत. बदलापुरात जलकुंभांची उभारणी आणि वाहिन्या टाकण्यात दिरंगाई झाल्याने पाण्याचे आरक्षण असूनही पाणी उचल करता येत नाही. तसेच जलशुद्धीकरण केंद्रही वेळीच पूर्ण न झाल्याने पाण्याची उपलब्धता असतानाही ते नागरिकांना पुरवण्यात अडचणी येत आहेत.
