कल्याण: गेल्या तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका कल्याण परिमंडलातील वीज वितरण यंत्रणेला बसला आहे. वादळामुळे ७० विजेचे खांब, ५ रोहित्र व पाच किलोमीटरच्या वीजवाहिन्या जमीनदोस्त झाल्या आहेत. विपरित परिस्थितीतही युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करून महावितरण कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.

कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिम भागात एक खांब कोसळला असून चार ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याने वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, टिटवाळा तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्चदाबाचे ४ खांब व लघुदाब वाहिनीचे ६५ खांब कोसळले व ४ किलोमीटरच्या वीजतारा, तसेच १ रोहित्र कोसळण्यासोबतच ४ रोहित्र नादुरुस्त झाले होते.

मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंते, सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार घटनेच्या ठिकाणी राहून अथक काम करीत होते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही कमी कालावधीत वीजपुरवठा सुरळीत करणे शक्य झाले, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.