अंबरनाथ : शिर्डीला जाणाऱ्या बस अपघातात अंबरनाथ शहरातील मोरिवली गावातील आठ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात कुणाचे आई-वडिलांचे छत्र हरपले तर, काहींनी आपला मायेचा आधार हरवला. एकाच कुटुंबातील दोन ते तीन सदस्यांच्या मृत्यूने अवघे कुटुंब उदध्वस्त झाले असून या गावावर शोककळा पसरली होती. मोरिवली औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीच्या मालकांकडून दरवर्षी महिला कर्मचारी आणि नातेवाईकांना साईबाबांचे दर्शन घडवण्यासाठी यात्रा आयोजित केली जाते. दोन वर्षांच्या खंडानंतर ही यात्रा यंदा आयोजित करण्यात आली होती. मोरिवलीतून ३५ ते ४० भाविक गुरुवारी रात्री या यात्रेसाठी निघाले. मात्र सिन्नरजवळच्या पाथरे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात येथील आठ भाविकांचा मृत्यू झाला. दिवस उजाडताच ही बातमी गावात येऊन धडकली आणि गावात स्मशानशांतता पसरली. या अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. वैशाली (३२) आणि नरेश उबाळे (३८) या पती-पत्नीचा यात मृत्यू झाला तर, त्यांची मुलगी जखमी झाली. महालक्ष्मी पॅकेजिंगमध्ये कामाला असलेले दिलीप गोंधळी हे आई प्रमिला आणि कल्याण येथे राहणारी चुलत बहीण दीक्षासोबत तर राजेश वाडेकर हे पत्नी रोशनीसोबत या बसमधून शिर्डीला निघाले होते. या अपघातात दिलीप बचावले; मात्र त्यांची आई प्रमिला आणि चुलत बहीण दीक्षा यांचा मृत्यू झाला असून राजेश यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. अपघातात ३५ जण जखमी असून त्यामध्ये मोरिवली गावातील १६ जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत िशदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. नाशिक, शिर्डीकडे जाणाऱ्या भक्तांचा ओघही वाढत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना या महामार्गावर होणे आवश्यक आहे. - भरत उबाळे, सामाजिक कार्यकर्ते, शहापूर