मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरातील नागरिकांचा भविष्यातील प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. परंतु या सर्वच शहरांना जोडणाऱ्या ठाण्यातील कापुरबावडी जंक्शनजवळील एका भल्या मोठ्या जाहीरात फलकामुळे गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे येथील काम रखडले असल्याची बाब समोर आली आहे. हे जाहिरात फलक काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराला पालिका प्रशासनाने पत्र दिले असले तरी संबंधित ठेकेदाराकडून मात्र फलक काढण्यासाठी चालढकल सुरु असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ

मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचा भार वाढला असून यामुळे प्रवास करताना प्रवाशांची दमछाक होत आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूकीवरही भार वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ आणि वाहनांचे इंधन खर्ची पडत आहे. त्यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाची उभारणी सुरु केली आहे. त्यापैकी मुंबईतील काही प्रकल्पांची कामे पुर्ण करून या प्रकल्पांचे लोकार्पणही करण्यात आले आहे. तर, काही प्रकल्पांची कामे सुरु आहेत. अशाचप्रकारे ठाणे शहरात मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण ही शहरे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. या शहरातील प्रवासासाठी ठाण्यातील कापुरबावडी हे महत्वाचे जंक्शन असणार आहे. ठाणे-भिवंडी- कल्याण मेट्रो मार्गिका कापुरबावडी जंक्शन येथे जोडण्यात येणार असून हेच काम एका जाहीरात फलकामुळे गेल्या काही महिन्यांपासून रखडले असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>>राडारोडा उचलण्यासाठी विशेष पथके तयार करा, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

ठाणे शहरातील मोक्याच्या जागांवर भले मोठे जाहीरात फलक उभारलेले आहेत. या जाहीरात फलकांच्या उभारणीसाठी पालिकेने संबंधित ठेकेदारांना परवानगी देऊ केली आहे. काही ठिकाणी शौचालये आणि उद्यान उभारणीच्या बदल्ल्यात पालिकेने ठेकेदारांना जाहीरात हक्क देऊ केले आहेत. अशाचप्रकारे कापुरबावडी नाक्यावर एक भले मोठे जाहीरात फलक लावण्यात आलेले आहे. माजिवाड्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या वळणावरच हे भले मोठे फलक आहे. कापुरबावडी मेट्रो जंक्शन स्थानकाला भिवंडीची मेट्रो मार्गिका जोडण्यात येणार असून ही मार्गिका फलक लावलेल्या भागातून जाणार आहे. त्यामुळे हे ‌फलक काढून टाकण्यात यावे असे एमएमआरडीएने ठाणे महापालिका प्रशासनाला कळविले होते. त्यानुसार पालिकेने संबंधित ठेकेदाराला पत्र देऊन फलक काढण्यास सांगितले. परंतु संबंधित ठेकेदाराकडून मात्र फलक काढण्यासाठी चालढकल सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून केवळ ९० मीटर अंतर इतकेच मेट्रोचे काम रखडले आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा >>>ठाण्यात होणार महिला आयपीएल स्पर्धेचा लिलाव?, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह व्यवस्थापनाकडे एमसीएकडून विचारणा

राजकीय हस्तक्षेप ?
मेट्रोच्या कामात अडसर ठरत असलेला कापुरबावडी येथील जाहीरात फलक काढण्याबाबत एमएमआरडीएने कळविल्यानंतर पालिकेने संबंधित ठेकेदाराला तसे पत्र दिले. तसेच पालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला सातत्याने फलक काढण्याबाबत विचारणा केली जात आहे. परंतु महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्यासोबत बोलणे झाले असून तेच यावर आपल्याशी बोलतील, असे त्यांच्याकडून प्रशासनाला सांगितले जात आहे. तर, त्या माजी पदाधिकाऱ्याकडूनही पालिका प्रशासनाला ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून मेट्रोचे काम रख़डले असल्याची माहिती पालिकेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली. याविषयी पालिकेतील एकही अधिकारी प्रतिक्रीया देण्यास तयार नाही. एमएमआरडीएचे माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A billboard in thane blocked metro work amy
First published on: 02-02-2023 at 15:27 IST