ठाणे: काश्मीरच्या एका व्यवसायिकाची भिवंडीतील तिघांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूकीप्रकरणी त्या व्यवसायिकाने काश्मीरमधील श्रीनगर येथील कोठीबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ‘ झिरो प्रथम खबरी अहवालाद्वारे (झिरो एफआयआर) भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काश्मीर येथील नातीपुरा भागात व्यवसायिक राहतात. त्यांचा काश्मीरमध्ये कपड्यांचा व्यवसाय आहे. सुमारे दोन वर्षापूर्वी भिवंडीत राहणाऱ्या तिघांनी त्यांना व्हाॅट्सॲप क्रमांकावरून संपर्क साधला. तसेच त्यांच्याकडून एक लाख १४ हजार रुपयांचे कापड खरेदी केले.
कापड खरेदी केल्यानंतर व्यवसायिकाने पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या व्यवसायिकाला तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काही दिवसांनी त्यांचा मोबाईल क्रमांक देखील तिघांनी ब्लाॅक केला.
दरम्यान, याप्रकरणी काश्मीरी व्यवसायिकाने कोठीबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण भिवंडीतून घडल्याने ‘झिरो एफआयआर’द्वारे हे प्रकरण भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.