कल्याण – डोंबिवलीतील आयरे गावातील पालिकेच्या ग प्रभाग कार्यालयाने अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या बंगल्यावर पालिकेकडून मागील दोन वर्षापासून कारवाई करण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या तक्रारदार महिलेने आपल्या कुटुंबीयांसह पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

अलका शरद म्हात्रे, शरद म्हात्रे आणि त्यांचे कुटु्ंबीय यांनी पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आयरे गावातील एका जमिनीवर एका महिलेने बेकायदा बंगल्याची उभारणी केली आहे. या बंगल्याच्या बांधकामाविषयी आपण मागील दोन वर्षापासून पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभाग उपायुक्त, ग प्रभाग साहाय्यक आयु्क्त यांच्याकडे तक्रारी करत आहोत. या तक्रारींमुळे पालिकेने संबंधित बंगला बेकायदा म्हणून घोषित केला आहे. हे बेकायदा बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याने पालिकेने ते तोडून टाकावे म्हणून पालिका आयुक्तांपासून ते ग प्रभागापर्यंत सतत दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहोत. पण आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असे तक्रारदार अलका म्हात्रे यांनी सांगितले.

पालिका, पोलीस आपणास नेहमीच नरमाईची भूमिका घेण्यास सांगत आहेत. या बंगल्यात चारजण राहत आहेत. त्यांना बाहेर काढून बंगल्यावर कारवाई करणे पोलीस, पालिकेला अद्याप अवघड नाही. पण या दोन्ही यंत्रणा आपणास गेल्या दोन वर्षापासून उडवाउडवीची उत्तरे देऊन संबंधित बंगल्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ करत आहेत. ग प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी या बेकायदा बंगल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आपणास गेल्या महिन्यात दिले होते.

कारवाई होणार असल्यामुळे यापूर्वीचे आपण निश्चित केलेले बेमुदत उपोषण स्थगित केले होते. कारवाईचे आश्वासन देऊन, कारवाईची तारीख निश्चित करून पालिका, पोलीस त्या बांधकामांवर कारवाईच करत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने आपण या महत्वपूर्ण विषयाकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी कल्याण येथे पालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत बेकायदा बंगल्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असे तक्रारदार आणि उपोषणकर्त्या अलका शरद म्हात्रे यांनी माध्यमांना सांगितले.

बेकायदा बांधकामे तोडण्याची ३१ मेपर्यंत टाळाटाळ करायची आणि ३१ मे पर्यंत पावसाळा सुरू होत असल्याने त्यानंतर बांधकामे तोडता येत नाहीत, असा शासन आदेश जोडून तक्रारदार आणि वरिष्ठांची दिशाभूल करायची ही पालिका अधिकाऱ्यांची नेहमीची पध्दत राहिली आहे. तसाच प्रकार आपल्या तक्रारीसंदर्भात होण्याची शक्यता असल्याने आपण पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे, असे उपोषणकर्त्या अलका म्हात्रे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेने कारवाई केली नाहीतर मात्र आपण न्यायालयात दाद मागण्याची तयारीही ठेवली आहे.दरम्यान, आयरे गाव हद्दीतील राघो हाईट्स ही बेकायदा इमारत तोडावी म्हणून उज्जवला पाटील यांनी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. पाटील यांच्या तक्रारीवरून व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून यापूर्वी या भागातील एक इमारत पालिकेने भुईसपाट केली होती.