बदलापूर : मार्च महिन्यातच जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. नुकतीच ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी टंचाई असलेल्या गावांना मुबलक पाणी द्या, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच तालुक्यात दरवर्षी पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागते. यंदाही मार्च महिन्याच्या अखेपर्यंत टंचाईग्रस्त गावपाडय़ांची संख्या २५ पर्यंत पोहोचली होती. या महिन्यात या गावांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी अपुरे असल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात होती. काही ठिकाणी तर दोन गावांना एकच टँकर दिले जात होते. त्यामुळे हे पाणी मुबलक देण्याची मागणी केली जात होती.नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना भेट दिली. महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला यावेळी पुष्पा पाटील यांनी आले. तसेच या गावांना मुबलक पाणी देण्याच्याही सूचना केल्या.सात ग्रामपंचायतींतील गावे, पाडे तहानलेलेशहापूर तालुक्यातील अजनूप ग्रामपंचायतीतील उठावा, कोळीपाडा, बोंडारपाडा, वारलीपाडा, वरचा गायदरा, वाशाळामधील सखारामपाडा, राईचीवाडी, कोठारे ग्रामपंचायतींतील कोळीपाडा, थडय़ाचा पाडा, कसारा ग्रामपंचायतीतील चिंतामणवाडी, नारळवाडी, पारधवाडी, उम्रावणे गाव, दांड गाव, बिबळवाडी, धामणी ग्रामपंचायतींतील गोलभणगाव, भायेपाडा, वेळूक ग्रामपंचायतींतील खरमेपाडा, पटकीचा पाडा, कळभोंडेमधील नवीनवाडी, कळभोंडे, माळ ग्रामपंचायतीतींल माळ गाव, पाटीलवाडी, शिंदेवाडी, आंब्याचा पाडा अशा सात ग्रामपंचायतींतील पाच गावे आणि २० पाडय़ांवर यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे.