ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाचा निर्णय; वाहिन्या टाकणाऱ्यांवर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

ठाणे : महापालिका क्षेत्रातील वृक्ष आणि विद्युत खांबांवर विनापरवाना टाकण्यात आलेल्या इंटरनेट तसेच इतर वाहिन्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विद्युत विभागाने अशा बेकायदा वाहिन्या काढून टाकण्यासाठी गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहिन्या टाकणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात इंटरनेट तसेच इतर केबल टाकायच्या असतील तर, त्यासाठी संबंधित पुरवठादारांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशा वाहिन्या भूमीगत टाकण्यासाठीच पालिका परवानगी देते आणि त्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून ठराविक शुल्क आकारते. परंतु गेल्या काही वर्षांत हे शुल्क चुकविण्यासाठी अनेक पुरवठादारांनी पालिकेच्या परवानगीविनाच अशा केबलचे जाळे विणले आहे. शहरातील झाडांवर आणि विद्युत खांबावर अशा केबल टाकण्यात आल्या आहेत. या केबल तुटून काही वेळेस खाली पडतात किंवा त्या भागांत लोंबकळत असतात. यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जिवावर बेतू शकते. हा मुद्दा सभागृह नेते अशोक वैती यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. यावर विधी विभागाचे प्रमुख अ‍ॅड्. मकरंद काळे यांनी एखाद्या कंपनीने महापालिकेच्या परवानगीविना केबल टाकली असेल तर त्या दुर्घटनेची जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, असे उत्तर त्यांनी दिले. तर झाडांवरील तसेच विद्युत खांबावर ज्या केबल टाकण्यात आल्या आहेत, त्या काढून घेण्याबाबत वृत्तपत्रात नोटीस जाहीर करण्यात आली असल्याची माहिती विद्युत विभागाचे उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी दिली.

केवळ नोटीस देण्यापुरती कारवाई करून नका तर, केबल काढून टाका, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानंतर अशा सर्व केबलवर तात्काळ कारवाई करून अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे दखल करण्यात यावे. तसेच यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश महापौर म्हस्के यांनी दिले होते. आदेशानुसार पालिकेच्या विद्युत विभागाने अशा बेकायदा केबल काढून टाकण्याची तयारी सुरू केली असून गुरुवारपासून ही कारवाई सुरू होणार आहे. तसेच बेकायदा केबल टाकणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत.

शहरातील वृक्ष आणि विद्युत खांबांवर विनापरवाना टाकण्यात आलेल्या बेकायदा केबल काढून टाकण्यासाठी संबंधितांना १६ सप्टेंबरला नोटीस दिली होती. त्यात केबल काढून टाकण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आल्याने गुरुवारपासून बेकायदा विद्युत केबलविरोधात कारवाई सुरू करणार आहे.

विनोद गुप्ता, उपनगर अभियंता, विद्युत विभाग