गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करुन दुचाकी, चारचाकी चालविणाऱ्या २५ हून अधिक वाहन चालकांवर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने कारवाई केली. या दुचाकी स्वारांकडून दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असा एकूण ७० हजार रूपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली. मद्यपान करुन वाहने चालवित असल्याचे निदर्शनास आले - मद्यपान करुन वाहने चालवू नका, असे नियमित आवाहन करुनही वाहन चालक त्या सूचनांचे पालन करत नसल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करुन वाहन चालक वाहने चालविण्याची शक्यता विचारात घेऊन कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने कल्याण पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या तिसगाव नाका, मानपाडा चौक, पत्रीपूल, मलंग रोड, टाटा नाका भागात गस्त ठेवली होती. यावेळी दुचाकी स्वार, मोटार, अवजड वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी २५ हून अधिक दुचाकी, मोटार कार चालक मद्यपान करुन वाहने चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. हमीपत्र आणि दंडाची रक्कम वसूल करण्यात आली- १० वाहन चालकांकडे वाहनांची कागदपत्रे नव्हती. त्यांनी मद्यपान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि त्यांना न्यायालया समोर हजर करण्यात आले. त्यांच्याकडून हमीपत्र आणि दंडाची रक्कम न्यायालयाच्या माध्यमातून वसूल करण्यात आली. पादचारी, इतर वाहनांना धोका - अशीच कारवाई डोंबिवली, कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, उमेश गित्ते यांनी केली. आषाढाचा शेवटचा दिवस आणि श्रावण सुरू होणार असल्याने महिनाभर मांसाहर, मद्यपान करता येणार नसल्याने गटारी अमावस्येच्या दिवशी अनेक जण मद्यपान, मांसाहर करतात. काही जण मद्यपान करुन वाहने चालवितात. यामुळे पादचारी, इतर वाहनांना धोका होऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.