कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकांनी वेळीच तत्परता दाखवून सविता बिराजदार या रुग्ण महिलेला कळवा येथे नेण्याचा प्रयत्न केला असता तर सविता यांना दिलासा मिळाला असता. परंतु, पालिका रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक आणि अन्य रुग्णवाहिका चालक यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात अतिशय बेजबाबदार वर्तन केल्याने सविता बिराजदार यांचा मृत्यू झाला, असा आरोप ठाकरे गटाचे कल्याणमधील जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केला.

कल्याण पूर्वेतील सविता बिराजदार या मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा सोमवारी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाला. सविता या घरातील कर्त्या महिला होत्या. आपल्या दोन मुलांची गुजराण त्या आपल्या मजुरीतून करत होत्या. त्यांच्या जाण्याने ही दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख साळवी यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.

सविता बिराजदार यांच्या पायात दुखत होते. त्या पायी चालत रुग्णालयात आल्या होत्या. दीड तासानंतर त्यांची प्रकृती गंभीर होऊ लागल्याने त्यांना डाॅक्टरांनी कळवा येथे स्थलांतरित होण्याची सूचना केली. यावेळी रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सविता यांना कळवा येथे नेण्यासाठी पालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. म्हणून १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका मागविण्याचा प्रयत्न झाला. त्या रुग्णवाहिका यंत्रणेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यानच्या काळात सविता या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आल्या होत्या. या कालावधीत एक रुग्णवाहिका आली. पण त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने दोन रुग्ण असल्याशिवाय आपण कळव्याला जाणार नाही, अशी अडेल भूमिका घेतली. या दरम्यानच्या काळात सविता यांचा मृत्यू झाला, असे साळवी यांनी सांगितले.

सविता यांना कळवा येथे तत्परतेने नेण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात एक रुग्णवाहिका आणि चालकही उपस्थित होता. पण त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने डाॅक्टरांचे काही ऐकले नाही, अशीही माहिती आम्हाला मिळाली आहे, असे साळवी यांनी सांगितले.रुक्मिणीबाई रुग्णालयात दोन रुग्णवाहिका चालक यांची मनमानी आहे. परिवहन आणि इतर विभागातून आलेले रुग्णवाहिका चालक प्रामाणिकपणे आपली चालकाची कामे करतात. रुक्मिणीबाई रुग्णालयातील दोन रुग्णवाहिका चालक यांची मनमानी असल्याने त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची आणि त्यांना रुग्णालय विभागातून काढून अन्य विभागात चालक म्हणून नेमण्याची मागणी राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

रुक्मिणीबाई रुग्णालयात चार रुग्णवाहिका आहेत. त्या खासगी रुग्णवाहिकांचा व्यवसाय होण्यासाठी बंंद करून ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे. एका रुग्णवाहिकेची काही दिवसापूर्वी अपघातात थोडी मोडतोड झाल्याची चर्चा पालिकेत आहेत. पण हे प्रकरण वरिष्ठांपासून दडविण्यात आल्याची पालिकेत चर्चा आहे.