एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेला किंवा आरोपी असलेला गुन्हेगार फरार झाल्यानंतर पोलीस काही काळ त्याचा शोध घेतात. पण तो न मिळाल्यास त्याची ‘फाइल’ कायमची बंद केली जाते. मग तो आरोपी देशाच्या किंवा जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन आपल्या कारवाया सुरू ठेवतो. २००३मध्ये नालासोपाऱ्यातील एका व्यक्तीच्या हत्येतील मुख्य आरोपीही असाच फरार झाला. पोलिसांनी सुरुवातीला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याची ‘फाइल’ बंद झाली. तब्बल १५ वर्षांनंतर ही फाइल खुली करण्यात आली आणि थोडय़ाच कालावधीत तो आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. नव्वदच्या दशकात वसई-विरार परिसरातील वडराई चांदी तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. भाई ठाकूरची दहशत त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. सुभाषसिंग ठाकूर टोळीतील अनेकांना या प्रकरणात सजाही झाली. पण त्यापैकी एक आरोपी जामिनावर सुटल्यानंतर फरार झाला होता. हा आरोपी मिळत नसल्यामुळे त्याची फाइलही पोलीस दरबारी बंद झाली होती. दिल्लीतील एका गुन्ह्याप्रकरणी या आरोपीला पोटा न्यायालयाने पाच वर्षांची सजा ठोठावली होती. भाई ठाकूर, शामकिशोर गरिकापट्टी, सुभाषसिंग ठाकूर यांच्यासह या आरोपीने सजा भोगली होती. मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा दहा वर्षे केली. पाच वर्षांची आणखी सजा भोगण्याऐवजी हा आरोपी फरार झाला होता. पोलिसांना तो सापडतच नव्हता. २००३ मध्ये नालासोपारा येथे जमिनीच्या वादातून राजेंद्र पतंगे यांची हत्या गोळीबार करून करण्यात आली होती. छोटा राजन टोळीने ही हत्या केल्याचे तेव्हा स्पष्ट झाले होते. छोटा राजनच्या काही विश्वासू साथीदारांनी गोळीबार केल्याचीही माहिती तेव्हाच्या तपासात बाहेर आली होती. या मारेकऱ्यांपैकी एक आरोपी होता चंद्रकांत अण्णा पाटील ऊर्फ चंदूमामा ऊर्फ चरण पालेकर. तेव्हापासून तब्बल १५ वर्षे हा आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कांदिवली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील सहायक निरीक्षक शरद झिने यांना या चंदूमामाबाबत माहिती मिळाली आणि चंदूमामाचे शोधसत्र साधारणत: वर्षभरापूर्वी सुरू झाले. चंदूमामाचे आताचे छायाचित्रही उपलब्ध नव्हते. २५ वर्षांपूर्वीचे एक जुने छायाचित्र होते. परंतु अर्थात त्याच्या व्यक्तिमत्त्वात बराच बदल झालेला असणार. त्याची नालासोपाऱ्यात बरीच मालमत्ता होती. त्याचे कुटुंबीय नालासोपाऱ्यातच राहत होते. त्याच्या मुलांकडे पोलिसांनी चौकशी केली. परंतु आपण तेव्हा लहान होतो, अशी उत्तरे मुलांकडून मिळाली. आपल्याला काहीही माहिती नाही, असेच मुले सांगत होती. शेजारील मंडळींकडेही पोलिसांनी चौकशी केली. परंतु काहीही फायदा झाला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवूनही चंदूमामाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु फारसे यश आले नाही. चंदूमामा बेळगावला राहत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांच्या पथकाने तेथे काही दिवस तळ ठोकला. परंतु तो नाव बदलून राहत असल्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा शोधण्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे काही काळातच त्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी सोडून दिला. त्याचवेळी सहायक निरीक्षक झिने यांना चंदूमामाशी संबंधित एक मोबाइल क्रमांक मिळाला. या क्रमांकावरून विविध प्रकारची माहिती मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काही महिने हा प्रयत्न सुरू होता. मात्र या मोबाइल क्रमांकामुळे चंदूमामाच्या काही नातेवाइकांची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची बहीण बोरिवलीत राहत होती. तिच्यावरही पाळत ठेवण्यात आली. याशिवाय मुलांकडूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. काही खबऱ्यांवरही चंदूमामाच्या तपशिलाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यापैकी एका खबऱ्याने तो बोरिवलीत बहिणीकडे येणार असल्याची पक्की माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून चंदूमामाला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने वेगवेगळी नावे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चंदूमामाच असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पतंगे यांच्या हत्येची कबुली दिली. २००३ पर्यंत आपण नालासोपारा परिसरातच होतो. पतंगे यांच्या हत्येनंतर सुरुवातीला पुण्याला गेलो. तेथे तब्बल २०१० पर्यंत नाव बदलून राहिलो. त्यानंतर आपण बेळगावला वास्तव्याला होतो. परंतु या काळात आपण बोरिवली-नालासोपारा परिसरात येऊन जायचो. प्रत्येक वेळी वेगळा वेष धारण करायचो. नावही बदलायचो. मात्र बहिणीकडे आपण आवर्जून जायचो. त्यामुळेच चंदूमामाची माहिती खबऱ्याला मिळाली आणि तब्बल १५ वर्षांनंतर त्याला गजाआड व्हावे लागले..