ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रशीद शेख (२७), वसीम शेख (२०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्याकाही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळेत लुटारूंच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक, व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. झारखंड येथे राहणारे तसलीम अन्सारी हे मुंबई नाशिक महामार्गावरून त्यांच्या टेम्पोने भिवंडीत आले होते. वाहन चालवून दमछाक झाल्याने त्यांनी गुरुवारी मध्यरात्री मानकोली पूलाजवळील रस्त्याकडेला टेम्पो उभा केला आणि टेम्पोमध्ये आराम करत होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोघे त्यांच्या टेम्पोमध्ये शिरले आणि त्यांनी तसलीम यांच्याकडून त्यांचा १० हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल घेऊन दुचाकीवर दोघेही चोरटे निघून जात असता तसलीम यांना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना मारहाण करून काही अंतर फरफटत नेले. हेही वाचा : ठाणे पालिकेच्या सफाई कामगारांवर आता जीपीएस प्रणालीद्वारे नजर दरम्यान, नारपोली पोलिसांचे गस्ती पथक हे त्याठिकाणी गस्ती घालत असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे रशीद आणि वसीम असल्याचे सांगितले. तसेच ते भिवंडी येथील नवीवस्ती भागात वास्तव्य करत होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.गेल्याकाही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर लुटारूंच्या काही टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या भागात गस्ती घातली जात आहे. पोलिसांकडून येथील वाहन चालकांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.