ठाणे महापालिकेचा सर्वसाधारण सभेचा प्रस्ताव ठाणे : वाहतूक कोंडीग्रस्त घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खारेगाव ते गायमुख असा खाडीकिनारी मार्ग तयार करण्यात येणार असून हा मार्ग तयार करताना कमीत कमी कांदळवन कसे बाधित होईल, याचा विचार पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनाने जागा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव तयार केला असून तो येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल होऊन नवीन आरखडा तयार केला जाणार असल्याचे दिसून येते. घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खाडीकिनारा मार्गाची घोषणा काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु गेले अनेक वर्षे हा प्रकल्प कागदावरच होता. दरम्यान खाडी किनारा मार्गाचा आराखडा ठाणे महापालिकेने ‘एमएमआरडीए’कडे पाठवला असून यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग आल्याचे चित्र आहे. सुमारे १३ किमीच्या या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या कामामध्ये काही प्रमाणात कांदळवन क्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामात कमीत कमी कांदळवन क्षेत्र बाधित व्हावे यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. आरक्षणात फेरबदल बाळकूम येथील मुंबई-आग्रा रस्त्यापासून मुंबई महापालिकेची जलवाहिनी, उल्हास नदीवरून खारीगाव येथील ४५ मीटर रुंद रस्त्यापर्यंत प्रस्तावित ४० मीटर रुंद रस्त्याने बाधित ४.७५०४ हेक्टर जमिनीच्या आरक्षणात फेरबदल करावा लागणार आहे. त्यात एचसीएमटीआर कारशेड, मुंबई महापालिका जलवाहिनी, हरित क्षेत्राचा समावेश आहे. हा मार्ग बाळकूम येथे उन्नत स्वरूपाचा असल्याने तेथील आरक्षणात कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.