डोंबिवली परिसरात सीएनजी गॅस भरणा केंद्र सुरू करण्याचे आश्वासन देऊनही पाळले जात नसल्याने येत्या गुरुवारी या परिसरातील रिक्षाचालकांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील रिपब्लिकन रिक्षा संघटनेने हा इशारा दिला असला तरी त्यास इतर संघटनांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे बंद आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी शिवसेनाप्रणीत रिक्षा युनियनचे पदाधिकारी आग्रही असून रिपब्लिकन संघटनेने पुकारलेला हा बंद मोडीत काढण्याची रणनीती आखली जात आहे.
रिक्षा संघटनांच्या या वादात प्रवाशांची मात्र गुरुवारी त्रेधातिरपीट उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपब्लिकन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामा काकडे यांनी गुरुवारी रिक्षा बंदचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभर खासदार, आमदार, नगरसेवकांकडून डोंबिवलीत सीएनजी पंप सुरू करण्याची आश्वासने दिली जात आहेत. हे पंप सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष कोणीही हालचाल करीत नाही. डोंबिवली पश्चिमेत रेतीबंदर खाडी किनारा भागात सीएनजी पंप सुरू करण्याचे आश्वासन एका लोकप्रतिनिधीने दीड वर्षांपूर्वी दिले होते. हा विषयही हवेत विरला असल्याची टीका काकडे यांनी केली आहे.
सीएनजी पंप डोंबिवली परिसरात नसल्याने रिक्षा चालकांना महापे, अंबरनाथ, कोन, कल्याण येथे जावे लागते. या ठिकाणी रिक्षांच्या रांगा असतात. अनेक वेळा वीज नसते. त्यामुळे चालकांचे आर्थिक नुकसान होते. शहरातील रिक्षा बाहेर गॅस भरण्यासाठी जात असल्याने शहरात गर्दीच्या वेळेत रिक्षा उपलब्ध नसतात. यामध्ये महिलांना सर्वाधिक त्रास होतो. गॅसवर रिक्षा सुरू झाल्यास प्रवासी भाडय़ाचे दोन ते तीन रुपये कमी होतील, हा विचार करून आपण रिक्षा बंदचे गुरुवारी आवाहन केले आहे, असे काकडे यांनी सांगितले.
दरम्यान, हे संप आंदोलन मोडीत काढण्यासाठी इतर संघटना पुढे सरसावल्या असून केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी व प्रवाशांना वेठीस धरण्यासाठी रिपब्लिकन संघटना रिक्षा बंद करीत आहे, अशी टीका शहरातील अन्य रिक्षा संघटनांचे पदाधिकारी काळू कोमास्कर, शेखर जोशी, संजय मांजरेकर, दत्ता माळेकर, अंकुश म्हात्रे, संजय पवार यांनी केली आहे. रिपब्लिकन संघटनेला आव्हान देण्यासाठी शिवसेना, भाजप, लाल बावटाप्रणीत रिक्षा संघटनांनी सोमवारी पालिकेच्या आंबेडकर सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार नाईक आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी सीएनजी पंप सुरू करण्यामधील अडचणी सांगितल्या. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना डोंबिवली परिसरात सीएनजी पंप शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. हा पंप सुरू करण्यासाठी या कुटुंबीयांनी २१ लाख रुपयांचा भरणा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करायचा आहे. हा भरणा कुटुंबीयांना करता येत नसेल तर यामध्ये शासनाने मध्यस्थी करावी.