बदलापुरातील निवासींबाबत पालिकेचे अन्य पालिकांना पत्र बदलापूर : बदलापूर शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने बदलापूर नगरपालिकेने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांतील अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले अनेक बदलापूरकर दररोज या शहरातून त्या शहरात प्रवास करत असतात. अशा कर्मचाऱ्यांमार्फत करोनाचा प्रसार होण्याच्या भीतीने त्या कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था त्या त्या पालिका क्षेत्रांत केली जावी, अशी विनंती करणारे पत्र बदलापूर नगरपालिकेने अन्य महापालिका, पालिकांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी बदलापूरमध्ये वास्तव्यास आहेत. हे कर्मचारी दररोज मुंबईत ये-जा करत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलापूर शहरात आतापर्यंत १६ रुग्णांची नोंद झाली असून त्यातीत नऊ जणांना मुंबईतून संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अशा कर्मचाऱ्यांमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याचा सूर सर्वानी लावला. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची सोय त्या त्या महापालिकेने आपापल्या शहरांत केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल, यावर उपस्थितांचे एकमत झाले. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला आणि संबंधित पालिकांना याबाबत पत्रव्यवहार केला जाईल असा निर्णय घेतल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांत कठोर अंमलबजावणी बदलापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नागरिक बाहेर ये-जा करत असल्याच्या तक्रारी आल्याने अशा क्षेत्रांमध्ये आता नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच भाजीपाला विक्री प्रत्येक प्रभागात सुरू असून तरीही एकाच ठिकाणी नागरिकांनी गर्दी केल्यास त्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी या वेळी दिला आहे.