बदलापूर : बदलापूर पश्चिम भागात सोमवारी मुख्य जलवाहिनीवर तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे बदलापूर पश्चिम भागात सोमवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
बदलापूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्यातून पाणी उचलून उचलून शुद्धीकरण केले जाते. त्यानंतर ते बदलापूर, अंबरनाथ शहराला पुरवले जाते. अंबरनाथ शहराचे इतरही जलस्त्रोत असले तरी बदलापूर शहराचे फक्त उल्हास नदी हाच एक जलस्त्रोत आहे.
बॅरेज बंधाऱ्यातून विविध जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरात पाणी पुरवठा केला जातो. यातील पश्चिम येथील मुख्य जलवाहिनीवर सोमवार, ९ जून रोजी तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे. सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवर काम केले जाणार आहे. या १२ तासांच्या काळात बदलापूर पश्चिमेतील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिमेत या काळात पाणी नसेल. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवत जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन दिवस होणारा पाणी पुरवठा अनियमित आणि कमी दाबाने राहिल, अशीही माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.