ठाणे : गेल्या अडीच वर्षातील माजी मंत्र्यांच्या सर्वच विभागांची चौकशी केली जाणार असल्यासंदर्भात बाळासाहेबांची शिवसेनेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावर आता राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग होता. मग, त्यांच्या विभागाचीही चौकशी करण्यात येणार आहे का, असा प्रतिप्रश्न परांजपे यांनी विचारला आहे. तसेच आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही त्याविरोधात लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर बाळासाहेबांची शिवसेना काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीतील माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांच्या चौकशी केली जाणार असून त्याबाबतचा निर्णय लवकरच येणार आहे. तेव्हा कोणाला जामिन मिळतोय का बघा असा सूचक इशारा बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिला होता. त्यास राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर देत आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग होता.

हेही वाचा: “माझ्या मुलीला मैत्रीणी विचारत आहेत की तुझ्या वडिलांनी…”; विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजीनाम्याबद्दल बोलताना आव्हाडांचं विधान

मग, त्यांच्या विभागाचीही चौकशी करण्यात येणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्याचे धारिष्ठ प्रवक्ते नरेश म्हस्के दाखविणार आहेत का, अशी विचारणाही परांजपे यांनी केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले ४० आमदारांपैकी अनेकजण महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यात अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराजे देसाई यांनीही घेतलेल्या निर्णयाची चौकशी लावणार आहे का ? चौकशी होईल तर सर्वांची होईल. केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चौकशी होणार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: “माझ्या खुनाचा कट रचला असता, तरी चाललं असतं पण…”, विनयभंगाच्या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटला

आम्ही कुठल्याही चौकशीला तयार असून आम्ही चौकशीला घाबरत नाही. आम्ही त्यांच्याकडून अशाच वागणुकीची अपेक्षा करतो की, ते आमच्यावर खोटे गुन्हे करून त्यात आम्हाला गोवणार आहेत. परंतु त्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत. कलयुगातील कितीही नारद, चाणक्य, डाॅक्टर लोकप्रतिनधी बोलले तरी राष्ट्रवादी अजिबात घाबरलेली नाही आणि घाबरणारही नाही. या उलट न्याय हक्क, ठाणेकरांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जेलमध्ये एकदा नाही अनेक वेळा जावे लागले तरी आमची तशी तयारी आहे, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasahebanchi shivsena naresh mhaske conflict ncp thane president anand paranjape enquiry mva minister thane tmb 01
First published on: 14-11-2022 at 17:12 IST