ठाणे : पोटनिवडणूका बिनविरोध होतात अशी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी इतर राजकीय पक्षांनी विचार करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवारी आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘बुद्ध रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महायुती म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याचा इतर पक्षांनी विचार करावा असे शिंदे म्हणाले. तसेच धम्म आंतरराष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावरूनही त्यांनी संवाद साधला. इराण आणि अमेरिका- इस्त्रायलचे युद्ध सुरु आहे. सीमांवर तणावर आहे. निरपराध नागरिकांचे जीवन उध्वस्त होत आहे. संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लहान मुलांचे बळी जात आहेत. आपण मानवता विसरत आहोत, अशा काळात भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण जगाला वाचवू शकते असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संत परंपरेच्या वारशातून जगाला ‘युद्ध नको, बुद्ध हवा.’ सध्या भौतिक सुखाच्या मागे धावण्याची स्पर्धा सुरु आहे. परंतु धावपळीमध्ये मानसिक सुख हरवत आहे. गौतम बुद्ध यांनी दाखविलेला मार्ग तारणारा आहे. गौतम बुद्ध आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना आदरांजली असल्याचेही शिंदे म्हणाले.

बौद्ध हा धर्म नसून सामाजिक सिद्धांत, क्रांती आहे. धम्म म्हणजे सजीवांच्या कल्याणाचा शाश्वत मार्ग आहे. हा धर्म सदाचाराची शिकवण देणारा आहे. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला जगण्याचा मार्ग शिकविला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दीक्षा घेतली. लाखो लोकांना समानता, स्वाभिमानाचा मार्ग मिळवून दिला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला केवळ संविधान दिले नाही. तर, मातीला बुद्धांचा धम्म पुन्हा मिळवून दिला. त्यामुळेच माझ्या सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, ज्योती वाघमारे राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि ठाण्यात शर्मिला पिंपळोलकर या महापौर झाल्या असा उल्लेखही त्यांनी केला.