बदलापूर: हवामान खात्याचे भाकीत खोटे ठरवत जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचवेळी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजघडीला केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबई शहराप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही पाणीकपात करावी लागू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिन्याच्या अखेरीसच राज्यात दाखल होण्याची आशा असलेल्या मान्सूनने यंदा उशीर केला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद  झाली. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४०० मिलिलिटर पावसाची नोंद जून महिन्यात केली जाते. गेल्या वर्षांत ठाणे जिल्ह्यात ६६६.६ मिलिलिटर पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या १६५.५ टक्के अधिक पाऊस पडला होता. त्यामुळे जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने जलस्रोतातील पाणीसाठी झपाटय़ाने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात २७ जूनपर्यंत अवघ्या ३२.३ टक्के पावसाची नोंद झाली असून अवघा १२९.४ मिलिलिटर पाऊस पडला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पावसाने सरासरी गाठली नाही तर जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट ओढवू शकते.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि ग्रामीण भाग तसेच औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर आंध्र धरणातून आणि भिवपुरी विद्युत प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी राखली जाते. मात्र कमी पावसामुळे सध्याच्या घडीला जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याचे समोर आले आहे. बारवी धरणाची पाणीसाठा क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र सध्याच्या घडीला बारवी धरणात १०७.७९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या हे प्रमाण अवघे ३१.३६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षांत हाच पाणीसाठा ३८.८८ टक्के इतका म्हणजे १३१.७३ दशलक्ष घनमीटर इतका होता. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे. 

३० जून रोजी आढावा

येत्या ३० जून रोजी जलसंपदा विभाग संबंधित विभागांसोबत जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये उपलब्ध पाणी साठय़ाचा आढावा घेतील. तोपर्यंत पाऊस आला नाही आणि जलस्त्रोतांतील पाण्याची पातळी खालावणे सुरूच राहिल्यास जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे मत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अघोषित पाणीकपात सुरूच

देखभाल आणि  दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या काही दिवसात काही तासांपासून ते एक दिवसापर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जातो आहे. ही अघोषित पाणीकपातच असल्याच्या भावना आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही दिवसात ठाणे, कल्याण डोंबिवली भागात दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barvi dam has 31 percent water storage zws
First published on: 28-06-2022 at 00:12 IST