भिवंडी येथील सुपेगाव भागात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या कंत्राटाचे देयक मंजूर केल्याने त्याबदल्यात २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या सुपेगाव ग्रामपंचायतीचा प्रशासक सुदेश भास्कर (५६) आणि ग्रामसेवक जयेश थोरात यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी काही महिन्यांपूर्वी सुपेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुरूस्तीचे कंत्राट घेतले होते. हे काम जानेवारी महिन्यात पूर्ण झाले होते. मे महिन्यात कामाचे देयक मंजूर केल्याने त्याबदल्यात २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी जयेश याने तक्रारदार यांच्याकडे केली होती. यातील काही रक्कम सुदेश याला दिली जाणार होती.

या मागणीनंतर तक्रारदार यांनी ठाणे एसीबी कार्यालयात धाव घेऊन जयेश आणि सुदेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने गुरूवारी सापळा रचून जयेशला २० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. त्यानंतर सुदेश यालाही ताब्यात घेतले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.